![जंकफूड दिनविशेष : जंकफूड सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2FCopy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-8-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : दीपिका वाघ
जिभेचे चोचले पुरवणारे जंकफूड खायला कितीही स्वादिष्ट लागत असले, तरी शरीराचे अतिरिक्त वजन वाढविण्यात मोठा हातभार लावतात. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये 'ओबीसिटी' लठ्ठपणाची मोठी समस्या दिसून येते. वय आणि उंचीच्या मानाने अतिरिक्त वजन म्हणजे लठ्ठपणा मानला जातो. लठ्ठपणा हा चेष्टेचा विषय ठरत असला तरी अतिरिक्त वजन मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकारसारख्या समस्यांना निमंत्रण देते. पुढे वजनामुळे हालचालींवर मर्यादा येऊन चालणे-फिरणे कमी होते. जंकफूडमध्ये पिझ्झा, बर्गर, फेंच्र फ्राय, केक, चिप्स थोडक्यात मैदायुक्त बेकरी व तेलकट पदार्थ मोडतात.
आताच्या घडीला लठ्ठ होत जाणारे मूल पालकांसमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. बदलती जीवनशैली व लठ्ठपणामुळे तरुणवर्गाचे सर्वांत मोठे नुकसान होत आहे. भारत तरुणांचा देश मानला जातो. पण, ३८ टक्के तरुण अतिरिक्त वजनाने त्रस्त आहेत. आईवडील नोकरदार असल्याने पॅकेट फूड, 'रेडी टू इट' पदार्थ सर्वाधिक प्रमाणात खाल्ले जातात. त्यासाठी आता समुपदेशनाची गरज आहे. रोजच्या घेतल्या जाणाऱ्या आहारातून शरीराला किती घटक मिळतात, त्यातून एनर्जी किती वाया जाते त्यानुसार आहार घेणे आता गरजेचे झाले आहे.
लठ्ठपणा पालकांसमाेरील मोठी समस्या
मुलांना शाळेत जायला व घ्यायला व्हॅन असल्यामुळे त्यांचे चालणे-फिरणे कमी झाले आहे. झटपट भूक भागवणारे 'रेडी टू इट' पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात. पाश्चात्य देशातील खाद्यसंस्कृती भारतात मोठ्या प्रमाणात रुजल्यामुळे जंकफूड खाणे जीवनशैलीचा भाग झाला आहे. लठ्ठपणाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास वजन आटोक्यात आणणे अवघड बनते. त्यासाठी वय आणि उंचीनुसार आवश्यक असणारे वजन आटोक्यात ठेवल्यास लठ्ठपणासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.
११ ते १७ वयोगटांतील मुले लठ्ठपणाने त्रस्त आहेत. १०० मधून ३० रुग्ण वजन कमी करून द्या म्हणून तक्रार घेऊन येतात. पॅक फूड अधिक काळ टिकण्यासाठी त्यामध्ये शुगर, फॅटस, कलर, मिठाचे प्रमाण अधिक असते. ते खाल्यानंतर कालांतराने त्याचे परिणाम शरीरावर जाणवायला लागतात. वजन वाढल्यानंतर हालचालींवर मर्यादा येतात चालणे-फिरणे बंद होऊन गुडघे, सांधे दुखी सुरू होते. एक वेफर्सचे पॅकेट खाल्ले तरी ते एकवेळच्या जेवणाप्रमाणे असते. त्यासाठी आपण काय खातो त्याचे मोजमाप झाले पाहिजे. त्यानुसार आहार घ्यायला हवा.
– डॉ. राहुल पाटील, कन्सलटिंग फिजिशियन
हेही वाचा :