कुरुंदवाड : जमीर पठाण – जालना- अंतरवालीत समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांनी भ्याड हल्ला चढवून अमानुष लाठीमार केला. पुरुषांबरोबरच महिला आंदोलकांवर लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील सकल मराठा समाजबांधवातर्फे कुरुंदवाड येथे निषेध फेरी काढण्यात आली. शिवतीर्थ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
जालना जिल्ह्यात आंदोलकांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहरातील शिवतीर्थ नवबाग, रस्ता, एस के पाटील कॉलेज, महाराणा प्रताप चौक, सन्मित्र चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पालिका चौक, दर्गाह चौक ते पुन्हा शिवतीर्थ येथे आल्यानंतर निषेध फेरीचे सभेत रूपांतर झाले.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, जालना येथील मराठा आंदोलकांच्या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू असताना हे आंदोलन मोडित काढण्याच्या उद्देशाने राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासनाने आंदोलकांच्यावर लाठीमार करून महिला आंदोलकांनाही मारहाण केली. हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. त्यामुळे आंदोलकांना पळवून लावलं. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? याची सखोल चौकशी होऊन जालना जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत ५८ मोर्चे आणि आंदोलने झाली. ती शांततेच्या मार्गाने झाली. अशाच पद्धतीने जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलकांच्यावर लाठीमार करून हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार झाला आहे. या सर्व घटनेची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे म्हणाले, मराठा समाजाने आपल्या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात. त्याचबरोबर आपल्या विविध न्याय-हक्काच्या मागणीसाठी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत आहेत. आजपर्यंत आंदोलकांच्यावर लाठी हल्ला करून त्यांना आंदोलनापासून मज्जाव करणाऱ्या या सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करत असल्याचे सांगितले.
यावेळी सकल मराठा समाजाचे सागर धनवडे, शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, काँग्रेसचे विजय पाटील, उदय डांगे, राष्ट्रवादीचे तानाजी आलासे बबलू पवार, बाबासाहेब सावगावे, अजित देसाई आदींनी भाषणे केली. यावेळी संजय अनुसे, जालंदर सांडगे, मिलिंद गोरे, गोपाळ चव्हाण, बबलू पवार, विलास उगळे, बी. बी सूर्यवंशी, रमेश भुजुगडे, आनंदराव लांडगे आदी उपस्थित होते.