जळगांव : पुढारी वृत्तसेवा– भुसावळ रेल्वे व रेल्वेच्या कॉटर्स यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील डग मध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी काम करीत असलेल्या 16 वर्षीय कामगाराचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. मृतदेह रेल्वे रुग्णालयात नेण्यात आला असून त्या ठिकाणी लोक संघर्ष समितीने अधिकाऱ्यांनी रेल्वेचे अधिकारी आल्याशिवाय बोलणी केल्याशिवाय शवविच्छेदन व मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेसाठी लागणाऱ्या पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊस मधील डग मध्ये साचलेला गाळ गेल्या एक महिन्यापासून कामगार काढत आहेत. ज्या डग मध्ये गाळ साचलेला आहे ती बारा ते पंधरा फूट खोल असल्याने त्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने गाळ काढण्यात येत आहे.
हे इमर्जन्सी काम असल्याने याचे कोणत्याही प्रकारचे टेंडर काढण्यात आलेले नव्हते. रेल्वेचे सीनियर सेक्शन अभियंता यांनी हा ठेका दिलेला होता. हा गाळ काढण्यासाठी जामनेर तालुक्यातील गंगापूर येथील दयाराम दिलीप बारेला, बिना दिलीप बारेला, रवी दिलीप बारेला, श्याम रालू बारेला, सुनील मंगलसिंग बारेला व मयत सखाराम जिना बारेला हे काम करीत होते. दरम्यान शुक्रवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता ही दुर्घटना घडली. अचानक त्या ठिकाणी असलेल्या मशीनमध्ये विद्युत प्रवाहाचा शॉक लागून सर्व कामगार बाहेर फेकले गेले. यामध्ये एका अल्पवयीन कामगाराचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह हा रेल्वे रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी लोक संघर्षाचे उपाध्यक्ष सचिन धांडे, चंद्रकांत पाटील, जिल्हा संपर्क सिताराम सोनवणे व इतर कार्यकर्ते रेल्वे दवाखान्यात उपस्थित होते.
लोक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन चर्चा करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र घेण्यात आला आहे. त्यामुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज रणदिवे व इतर सहकारी हे त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत तर रेल्वे सुरक्षा बलाचे अशोक कुमार अभियंता शशिकांत पाटील व इतर कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहे.
हेही वाचा