IPL Playoffs Scenario : कोहलीमुळे रोहित शर्माचे टेन्शन वाढले, RCB च्या विजयाने बदलले प्लेऑफचे समीकरण

IPL Playoffs Scenario : कोहलीमुळे रोहित शर्माचे टेन्शन वाढले, RCB च्या विजयाने बदलले प्लेऑफचे समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Playoffs Scenario : आयपीएलच्या ब्लॉकबस्टर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. 18 मे (गुरुवार) रोजी हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले होते, जे विराटच्या संघाने चार चेंडू राखून पूर्ण केले.

आरसीबीच्या विजयाचा नायक स्टार फलंदाज विराट कोहली ठरला. त्याने शानदार शतकी खेळी (100 धावा) साकारली. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला असून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा पूर्णतः अबाधित आहेत.

आरसीबीच्या विजयाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढले आहे. हा सामना आरसीबीने गमावला असता तर मुंबई इंडियन्सने शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करण्याची संधी त्यांच्याकडे होती. पण आरसीबीच्या विजयामुळे प्लेऑफचे समीकरण खूपच रंजक झाले आहे. (IPL Playoffs Scenario)

आजपासून (दि. 19) पुढे आयपीएलमध्ये फक्त पाच लीग सामने खेळायचे आहेत. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकले आहेत. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रवास संपला आहे. उर्वरित सात संघ तीन स्थानांसाठी प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. (IPL Playoffs Scenario)

चेन्नई सुपर किंग्स :
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 13 पैकी सात सामने जिंकले आहेत. हा संघ 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सीएसकेला शेवटच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. जर CSK त्यांचा शेवटचा सामना हरला तर त्यांना मुंबई इंडियन्स, RCB आणि लखनौ सुपर जायंट्स यापैकी एका संघाचा त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. सीएसकेचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 20 मे रोजी आहे.

लखनौ सुपर जायंट्स :
लखनौ सुपर जायंट्सने गेल्या काही सामन्यांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. या संघाचे 13 सामन्यांत 15 गुण झाले आहेत. पण तरीही त्यांना प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. एलएसजीचा शेवटच्या सामना केकेआर विउद्ध 20 मे रोजी आहे. जर लखनौने त्यांचा शेवटचा सामना गमावला तर त्यांना प्रार्थना करावी लागेल की मुंबई इंडियन्स किंवा आरसीबी त्यांचा शेवटचा सामना हरेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी 13 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. यासोबतच मुंबई, सीएसके किंवा चेन्नईने शेवटचा सामना गमावावा अशी प्रार्थना करावी लागेल. आरसीबीसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा नेट-रनरेट (+0.180) जो मुंबई इंडियन्सपेक्षा चांगला आहे. जर आरसीबीने शेवटचा सामना जिंकला आणि मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध थोड्या फरकाने जरी विजय मिळवला, तरी फाफ डू प्लेसिसचा संघ प्लेऑफमध्ये राहील.

आरसीबीचा सामना 21 मे (रविवार) रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सशी होणार आहे. त्या सामन्यात जर आरसीबीला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले, तर ते त्यांच्यासाठी कठीण होऊ शकते. पण जर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना गमावला. तसेच पंजाब किंग्जनेही राजस्थानवर थोड्या फरकाने विजय मिळवला आणि लखनौने कोलकातावर मात केली, तर मात्र आरसीबी शेवटचा सामना गमावूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल.

मुंबई इंडियन्स :
पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स सध्या 14 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला शेवटचा सामना जिंकावा लागेल. यासह त्यांना आरसीबी, सीएसके किंवा लखनऊ यापैकी एक संघ त्यांचा शेवटचा सामना गमावेल अशी प्रार्थना करावी लागेल. जर मुंबईने त्यांचा शेवटचा सामना गमावला तर त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील कारण त्यांचा नेट-रनरेट मायनस -0.128 आहे. अशा परिस्थितीत मुंबईला RCB ने आपला शेवटचा सामना मोठ्या फरकाने गमावावा, तर पंजाब किंग्जने राजस्थानला कमी फरकाने पराभूत करावे आणि लखनौने कोलकाताविरुद्ध विजय मिळवावा, आशा करावी लागेल. एमआयला त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (21 मे) सामना खेळायचा आहे.

राजस्थान रॉयल्स :
2008 च्या चॅम्पियन राजस्थान रॉयल्सचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत आणि ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. राजस्थानला आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजयासह नशिबाची साथ हवी आहे. पंजाबवर विजय मिळवण्याबरोबरच, राजस्थानला मुंबई इंडियन्स आणि आरसीबीने शेवटचे सामने गमावण्याचीही आशा करावी लागेल, तर कोलकाता नाइट रायडर्सला लखनौविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना 19 मे रोजी होणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स :
दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. अशा स्थितीत शेवटच्या सामन्यातील विजयासोबतच त्याला अनेक समीकरणे आपल्या बाजूने करावी लागणार आहेत. जर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनौचा पराभव केला तर त्यांना आशा करावी लागेल आणि मुंबई इंडियन्स आणि आरसीबी त्यांचे शेवटचे सामने मोठ्या फरकाने गमावतील. यासह पंजाब किंग्जने राजस्थानविरुद्ध थोड्या फरकाने विजय मिळवावा. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 20 मे रोजी सामना होणार आहे.

पंजाब किंग्स :
एकदाही विजेतेपद न मिळवलेल्या पंजाब किंग्जचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत. म्हणजेच पंजाब किंग्ज 14 गुणांच्या पुढे जाऊ शकत नाही. पंजाब किंग्जला शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (19 मे) खेळायचा आहे. त्या सामन्यातील मोठ्या विजयाबरोबरच पंजाब किंग्जला प्रार्थना करावी लागेल की मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी त्यांचे शेवटचे सामने गमावले तर चौथा संघ नेट-रनरेटच्या आधारावर निश्चित केला जाईल.

IPL 2023 मधील उर्वरित सामने

19 मे : सायंकाळी 7.30 वाजता : पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, धर्मशाला
20 मे : दुपारी 03.30 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली
20 मे : सायंकाळी 7.30 वाजता : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता
21 मे : दुपारी 03.30 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई
21 मे : सायंकाळी 7.30 वाजता : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स, बंगळूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news