![एअर इंडिया www.pudharinews.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2F%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ओटावा, पुढारी ऑनलाईन : १९८५ ला एअर इंडियाच्या विमानात झालेल्या बाँब स्फोटातून निर्दोष सुटलेला शिख व्यावसायिक रिपुदमनसिंग मलिक याची कॅनडात हत्या झाली आहे. टार्गेटेड किलिंगचा हा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुरे या परिसरात ही घटना घडली आहे. रिपुदमन सिंग याचे वय ७०च्या जवळपास होते. त्याच्या हत्येमागील कारण पोलिसांनी सांगितलेले नाही.
१९८५ साली झालेल्या या स्फोटातील विमानातील ३२९ लोकांचा बळी गेला होता. आयर्लंड येथे या विमानाचा स्फोट झाला होता. तर याच वेळी जपानमध्येही विमानतळावर झालेल्या स्फोटात दोघांचा बळी गेला होता. हा स्फोट ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात कॅनडातील काही दहशतवाद्यांनी रचला होता, असे मानले जाते.
रिपुदमनसिंग यांनी या स्फोटासाठी पैसे पुरवल्याचा आरोप होता. २००५ला रिपुदमनसिंग आणि अजैबसिंग बागरी या दोघांची निर्दोष मुक्तता झाली होती. या स्फोट प्रकरणात इंद्रजीत सिंग रयात या एकाच दोषीला शिक्षा झालेली आहे.