![गूड न्यूज! देशातील IT कंपन्या पुढील ५ महिन्यांत ५० हजार फ्रेशर्संना देणार संधी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2Fmint.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र पुढील पाच महिन्यांत सकारात्मक वाटचाल करणार असून, जुलै ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ५० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची अपेक्षा आहे, असे 'टीमलीज ईडी-टेक प्लॅटफॉर्म'च्या ताज्या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये वाढीव नोकऱ्यांचा संधी उपलब्ध होणार असल्याचेही या अहवालात म्हटलं आहे. (Jobs in IT )
ईडी-टेक प्लॅटफॉर्मच्या अहवालात म्हटलं आहे की, क्लाउड कम्प्युटिंग, कृत्रिम प्रज्ञा (एआय), सायबर सुरक्षा आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानातील नवीन व्यवसायाच्या संधी आयटी उद्योगात उपलब्ध आहेत. 'टीमलीज'चे सीईओ शंतनू रूज यांच्या मते, "कृत्रिम प्रज्ञा (एआय), ब्लॉकचेन, क्लाउड कंप्युटिंग इत्यादीसारख्या नोकऱ्या लवकरच त्यांचे 'विदेशी' टॅग गमावणार आहेत. कोणत्याही कंपनीने आज त्यांच्या संपूर्ण व्यवसाय धोरणामध्ये 'एआय'चा समावेश करण्याची कल्पना न करणे हे बेजबाबदारपणाचे ठरणार असून आयटी क्षेत्र पुढील पाच महिन्यांत सकारात्मक वाटचाल करत ५० हजारहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची अपेक्षा आहे.
'टीमलीज'ने भारतातील १८ उद्योगांमधील ७३७ लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांचे सर्वेक्षण केले. त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, स्टार्टअप्ससह कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी जुलै-डिसेंबर 2023 दरम्यान ७३ टक्के इतकी असून यामध्ये ६५ टक्के संधी फ्रेशर्संना आहे. मार्केटमध्ये नवीन प्रतिभेची मागणी जानेवारी-जून दरम्यान ६२ टक्केच्या तुलनेत जुलै ते डिसेंबर ६५ टक्के असेल. बिझनेस ॲनालिटिक्स, ब्लॉकचेन, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा एन्क्रिप्शन, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिसिस आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) ही काही महत्त्वाची डोमेन कौशल्ये आहेत. फ्रेशर्सची नियुक्ती करू इच्छिणारे टॉप- तीन उद्योग अनुक्रमे ई-कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप (59%), दूरसंचार (53%), आणि अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा (50%) यांचा समावेश असल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.
'टीमलीज'अहवालानुसार, कंपन्या देखील नावीन्यपूर्ण प्रतिभेसाठी पदवी शिकाऊ उमेदवारांकडे वेगाने वळत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, प्रशिक्षणार्थींना सहभागी करून घेण्यास संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०२३मध्ये उत्पादन क्षेत्रात शिकाऊ उमेदवारांची भरती लक्षणीय ठरली आहे.
आयटी क्षेत्राव्यतिरिक्त पुढील सहा महिन्यांत उत्पादन, ई-कॉमर्स, दूरसंचार, फार्मास्युटिकल्स इत्यादी क्षेत्रांमध्ये विविध नोकऱ्यांमध्येही तरुणांना संधी उपलब्ध होणार आहे. अनेक परदेशी कंपन्या भारतभर इलेक्ट्रॉनिक उत्पादन संयंत्रे स्थापन करण्यासाठी १२०० दशलक्ष डॉलरहून ( १२० कोटी ) अधिकची गुंतवणूक करत आहेत. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रात 20,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त, 5G सेवेमुळे भारताच्या दूरसंचार बाजारपेठ मोठ्या कंपन्यांमध्ये 1,000 हून अधिक नोकऱ्यांच्या संधी निर्माण करण्याची शक्यता असल्याचे 'टीमलीज'ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
हेही वाचा :