पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस नेते, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असणारी भारत जोडो यात्रेला आज शुक्रवारी (दि.16) 100 दिवस पूर्ण होत आहेत. या यात्रेने आतापर्यंत 2800 हून अधिक किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. आता भारत जोडो यात्रा राजस्थानात सुरु आहे. भारत जोडो यात्रेच्या १०० दिवस (Bharat Jodo Yatra 100 days) निमित्ताने राहुल गांधी जयपूर येथील नवीन पीसीसी कार्यालयात आज पत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल गांधी यांची राजस्थानमधील ही पहिलीच पत्रकार परिषद असेल.
कन्याकुमारीमधून प्रारंभ सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेतील लोक राहुल गांधींसोबत दररोज 22 ते 23 किलोमीटर पायी चालत आहेत. दररोज सकाळी 7 वाजता यात्रेला प्रारंभ होऊन रात्री 10 वाजेपर्यंत पायी प्रवास होतो. या यात्रेत अनेकजण सहभागी झाले. जनतेतूनही प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेवर विरोधी पक्षातूनही आरोप करण्यात आले. यात्रेत सर्वसामान्य लोकांपासून ते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते. सेलिब्रेटी, लेखक, माजी नौसेना प्रमुख अॅडमिरल एल रामदास यांच्यासह लष्करी दिग्गज, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांसारखे विरोधी पक्ष नेते देखील विविध ठिकाणी मोर्चात सामील झाले. तर पूजा भट्ट, रिया सेन, सुशांत सिंग, स्वरा भास्कर, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी आणि अमोल पालेकर यांसारख्या चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.
कन्याकुमारी ते काश्मीर असा 3570 किलोमीटर प्रवास करणारी ही यात्रा भारतातील 12 राज्यातून जाणार आहे. 7 सप्टेंबर कन्याकुमारीपासून सुरु झालेल्या या यात्रेने आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आता राजस्थान या आठ राज्यांचा प्रवास केला आहे. 24 डिसेंबर रोजी ही यात्रा दिल्लीत दाखल होईल आणि अंदाजे आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि शेवटी जम्मू-काश्मीरमध्ये जाईल.
ही यात्रा सुरु व्हायच्या अगोदरपासूनच चर्चेत राहिली आहे. यात्रा सुरु झाली आणि राहुल गांधी यांच्या टी-शर्टची किंमत काय यावरुन वाद सुरु झाला. सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली. त्यानंतर त्यांच्या श्यूजची चर्चा झाली. त्यांची तुलना कार्ल मार्कशी होऊ लागली. कर्नाटकमधील पावसातील भाषण सोशल मीडियावर व्हायरलं झालं. महाराष्ट्रात आल्यावर सावरकारांबद्दल केलेल्या विधानावरुन टीकेला सामोरे जाऊ लागले. याचे पडसाद भारत जोडो यात्रेवरही उमटले. यात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तींवरुनही चर्चा होऊ लागली.
'भारत जोडो यात्रे'ला ( Bharat Jodo Yatra 100 days) आज शुक्रवार (दि.16) 100 दिवस पूर्ण होत आहे. यानिमित्ताने या यात्रेचे नेतृत्व करणा-या राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, बेरोजगारीच्या विरोधात, महागाईच्या विरोधात, तिरस्काराच्या विरोधात…आमची ही तपस्या कोणी रोखू शकले नाही आणि नाही कधी रोखू शकतील.
हेही वाचा