हिंगोलीत पुराचा हाहाकार! १०० जनावरे गेली वाहून

हिंगोलीत पुराचा हाहाकार! १०० जनावरे गेली वाहून

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसरातील आठ गावांमध्ये सुमारे १५  हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.  १०० जनावरे वाहून गेल्याने पशुपालकांचे नुकसान झाले आहे.  गावात साथरोग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने गावात पाणीस्त्रोताचे शुध्दीकरण करण्यास सुरवात केली आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा, आसेगाव, टाकळगाव, इंजनगाव, रुंज यासह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानी नंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या पथकाने भेट दिली. अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या सर्व गावांना भेटी दिल्या असून गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.

आजपासून सर्वेक्षणाचे काम

दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत प्रशासनाने सुमारे १५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये नदी, नाल्या काठी जमीन खरडून गेली तर नुकतेच पेरणी केलेले बियाणे वाहून गेली आहेत. या शिवाय सुमारे १०० पेक्षा अधिक जनावरे वाहून गेल्याचा अंदाजही प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यानंतर आजपासून सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ यांनी दिली आहे.

साथरोग पसरू नये यासाठी तातडीच्या उपाय योजना

दरम्यान या भागातील गावांमध्ये साथरोग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने तातडीच्या उपाय योजना हाती घेतल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांनी गावात भेटी दिल्या. गावातील सर्व पाणीस्त्रोताचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सुचना दिल्या असून त्यानुसार कामाला सुरवात झाली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वाढीव औषधीसाठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news