पुणे; पुढारी वृत्तसेवा : रविवारपर्यंत राज्यात मान्सून धो धो बरसत होता. मात्र सोमवारपासून राज्याच्या बहुतांश भागातून पाऊस कमी झाला. आता फक्त कोकणात हलका ते मध्यम पाऊस राहील. राज्यातून मान्सूनचे प्रस्थान 5 ते 12 ऑक्टोबरदरम्यान सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
25 सप्टेंबरपासून पूर्व राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. रविवारपासून त्याने वेग घेतला असून सोमवारी त्याने राजस्थानसह जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागातून माघारी फिरण्यास सुरुवात केली. आगामी दोन दिवसांत तो गुजरात राज्यातून प्रस्थान करण्यास सुरुवात करेल. त्यानंतर 5 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर भागातून तो परतीला निघेल. संपूर्ण राज्यातून तो 12 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या प्रवासाला जाईल, असा अंदाज हवावमान विभागाने व्यक्त केला आहे.
सोमवारपासून राज्यातील बहुतांश भागातून पाऊस कमी झाला. आता मान्सूनचा आस मध्य महाराष्ट्रावर आहे. त्यामुळे कोकणसह घाट माथ्यावर हलका ते मध्यम पाऊस 8 ऑक्टोबरपर्यंत राहील. मध्य महाराष्ट्रात 4 ऑटोबरपर्यंत हलका पाऊस राहील; तर मराठवाड्यातून तो पूर्ण ओसरला आहे. विदर्भात अजून दोन दिवस हलका पाऊस होईल. 6 ऑक्टोबरपासून राज्यात कोरडे वातावरण असणार आहे.
हेही वाचा