पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय लीला भन्साळी यांचं नाव कोण ओळखत नाही. संजय लीला भन्साळी यांची प्रेम कहाणी मनाला भावणाऱ्या आहेत. अधुरं प्रेम आणि विरह हे त्यांच्या चित्रपटांचे प्रमुख विषय आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करिश्मा दाखवला आहे. मग ते 'देवदास'चा मद्यपी देव असो वा 'हम दिल दे चुके सनम'चा मस्तमौला समीर वा 'गोलियों की रासलीला राम-लीला'मधील राम आणि लीला. यातील प्रत्येकाच प्रेम अधूरं राहतं. पण, तरीही चित्रपट हिट होतात. अशीच गोष्ट 'बाजीराव मस्तानी'मध्येही दिसली होती. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या ऑनस्क्रीन इश्कने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आज संजय लीला भन्साळी यांचा ५९ वा वाढदिवस आहे.
प्रेम आणि दु:ख, विरह, रोमान्स अशा अनुषंगाने भरपूर चित्रपट आणणारे दिग्दर्शक भन्साळी यांचा जन्म २४ फेब्रुवारी, १९६३ रोजी झाला होता. या गोष्टीचा खुलासादेखील झाला आहे की, त्यांच्या चित्रपटांमध्ये प्रेम, दर्द आणि विरहचं कॉम्बिनेशन का इतकं का पाहायला मिळतं. भन्साळींनी एका मुलाखतीत ही गोष्ट स्वीकारली होती की, ते रिलेशनशीपमध्ये होते. पण, ते पुढे जाऊ शकले नाही.
त्यांनी हे मान्य केलं होतं की, त्यांच आयुष्य 'अपूर्ण' होऊ शकतं. पण, 'दु:खाने भरलेलं' नाही. जेव्हा संजय लीला ५० वर्षांचे होते, तेव्हा ते म्हणाले होते- 'प्रेम, दु:ख, आवड आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीने मला बनवलं जो मी आज आहे. मी चित्रपटाच्या अशा स्टोरी बनवल्या आहेत, कारण माझ्या आयुष्यात प्रेम नाही. माझी कला माझं अपूर्ण आयुष्य पूर्ण करण्याचं काम करते. जरी माझं आयुष्य अधूरं असलं तरी ते दु:खाने भरलेलं नसावं.'
इंटरेस्टिंग म्हणजे भन्साळी यांनी या मुलाखतीत सलमान खान आपल्या मनाच्या जवळ असल्याचं म्हटलं होतं. सलमान खानने त्यांच्यासोबत 'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' यासारखे चित्रपट केले आहेत. 'खामोशी' इतका चालला नाही पण, या चित्रपटाचे कौतुक मात्र झाले होते. आता त्यांचा 'गंगूबाई काठियावाडी' रिलीज होणार आहे.