गोपीनाथ मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्यासारखे : हभप रामराव महाराज ढोक

गोपीनाथ मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्यासारखे : हभप रामराव महाराज ढोक

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा: दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज शुक्रवारी सकाळपासूनच गोपीनाथ गडावर अलोट गर्दी झाली आहे. स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभात रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाने सुरुवात झाली. हरिनामाच्या गजराने गोपीनाथ गड दुमदुमून गेला आहे. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वारकऱ्यांवर प्रेम केले आहे, गोपीनाथ मुंडे जाऊन ८ वर्ष झाले तरी विश्वास बसत नाही, गोपीनाथ हे अनाथाचे नाथ होते, गोपीनाथ मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्यासारखे असे भावोद्गार हभप रामनाचार्य रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर लोकनेते मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तन समारंभात ते बोलत होते. यावेळी ढोक महाराज म्हणाले की, मुंडे आपल्यात नसले तरी माजीमंत्री पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांच्या स्वरूपात ते कायम दिसतात. पंकजा मुंडे या झाशीच्या राणीसारख्या आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला शक्ती मिळाली पाहिजे. सुर्योदय व सुर्यास्त या नैसर्गिक घटना सारखे प्रत्येकाचे जीवन मरण ठरलेले आहे. मात्र, गोपीनाथ मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्यासारखे आहे. गोपीनाथ वारकऱ्यांना ते वारकरी होते, साधकाला ते माय- बाप तर अनाथला ते नाथ होते, अशा शब्दात ढोक महाराज यांनी स्व. मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

या कार्यक्रमास श्रीमती प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, प्रकाश महाजन, महादेव जानकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news