पुणे : मागील तीन दिवसांत राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. 13 ऑगस्टला कळवा रुग्णालयात अकरा जण दगावले, तर नांदेड मध्ये चोवीस तासांत एकतीस रुग्ण दगावले असून यामध्ये बारा नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या नांदेड घटनेनंतर राज्यातील आरोग्य विभागातील रिक्तपद आणि अपुरा औषधसाठ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेणाऱ्यांनी सर्व सामन्याच्या आरोग्याच्या दृष्टीने एक जरी बैठक घेतली असती, तर आज निष्पाप नागरिकांचा बळी गेला नसता. त्यामुळे विभागाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अंधारे यांनी यावेळी केली.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या रुग्णालय वैद्यकीय, शिक्षण की आरोग्य खात्याकडे येते यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. या गंभीर घटना घडली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारमधील मंत्र्यांचे नाराजी नाट्य सोडवण्यासाठी दिल्लीला गेले.
मुंबई, पुण्यात आरोग्य संचालक नाहीत. 83 टक्के पदे रिक्त आहेत. सरकार पाडण्यासाठी 150 बैठका घेतल्या, त्यांच्याकडे आरोग्य संचालकांच्या नियुक्त्यांसाठी एक बैठक घेता आली नाही. ऐन साथीच्या घटनांत हे केवळ बदल्यांमध्ये अडकले आहेत. आरोग्य खात्याच्या जागा किती रिक्त आहेत याचा तपशील सावंत यांनी द्यावा. असा सवाल सुषमा अंधारे यांनी आरोग्य मंत्र्यांना केला.
हेही वाचा