पुढारी ऑनलाईन : ५० प्रवाशांना विमानतळावरच सोडून विमानाने उड्डाण केल्या प्रकरणी गो फर्स्ट या कंपनीला डीजीसीआयने नोटिस बजावली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी बंगळूर येथे घडला.
बंगळूर विमानतळावर सकाळी साडेसहा वाजता हे विमान दिल्लीकडे जाणार होते. यासाठी प्रवासी विमानतळावर जमले होते. विमानतळावर प्रवाशांना विमानापर्यंत नेण्यासाठी बससेवा असते. सुरुवातीचे बरेच प्रवासी बसने विमानपर्यंत पोहोचले. या प्रवाशांचे बोर्डिंग झाल्यानंतर विमानने उड्डाण केले. पण जवळपास ५० प्रवाशी बसची वाट पाहात विमानतळावरच थांबून होते. हे प्रवासी बसमध्ये बसले आणि विमानाच्या दिशेने निघाले. पण धावपट्टीवर पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की विमानाने कधीच उड्डाण केले आहे. या प्रवाशांकडे विमानसाठीचे बोर्डिंग पासही होते आणि त्यांचे सामानही चेकइन करण्यात आले होते.
संतप्त झालेल्या प्रवाशांनी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना टॅग करून ट्विटरवर घडला प्रकार कथन केला.
हा प्रकार संतापजनक होता, यामुळे माझी महत्त्वाची मीटिंग चुकली असे बंगळूरमधील प्रवाशी सुमित कुमार यांनी म्हटले आहे. तर श्रेया सिन्हा म्हणतात, "माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात भयंकर प्रकार होता. आम्ही प्रवासी जवळपास एक तास बसमध्येच बसून होतो. विमान परत येईल असे आम्हाला सांगण्यात आले."
हेही वाचा