माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग काढणार नवा पक्ष

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे. ते नुकतेच दिल्ली दौऱ्यानंतर पंजाबमध्ये परतले आहेत. काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी मुख्यंमंत्रिपद सोडले. त्यानंतर ते भाजपमध्ये जातील असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली असून रवीन ठकुराल या त्यांच्या माध्यम सल्लागारांनी ही माहिती दिली आहे.

देशभर भाजपची लाट असताना पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मोठा हात होता. कॅप्टन यांच्या करिष्म्यामुळे सत्ता आली असे मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्षांतर्गत असंतोष वाढत असल्याने नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात खटके उडाल्याने सिद्धू यांना सत्तेबाहेर रहावे लागले. त्यामुळे काही काळाने सत्तेच्या स्पर्धेत आलेल्या सिद्धू यांनी आमदारांना आपल्या गोटात खेचत अमरिंदर सिंग यांची खूर्ची खेचली होती. निवडणुकांना काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसमधील सत्तासंघर्ष इरेला पेटला होता.

नवज्योत सिंधू ऐवजी चरणजित चन्नी यांना अनपेक्षितरित्या मुख्यमंत्री करून काँग्रेसनेही धक्का दिला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसमध्ये राहणार नाहीत हे आता समोर आले आहे. त्यांनी भाजपमध्ये चाचपणी केल्यानंतर फारशी संधी न दिसल्याने त्यांनी नवा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे.

'जोपर्यंत मी माझं राज्य आणि माझ्या लोकांचं भविष्य सुरक्षीत करत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे कॅप्टन सिंग यांनी म्हटले आहे. ठकुराल यांनी सिंग यांच्या सांगण्यावरून ट्विटमध्ये माहिती दिली आहे. नवज्योत सिंग सिद्ध पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. त्यामुळे त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली, तरीही मी त्यांना जिंकू देणार नाही, असा निर्धार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला होता. आता नवज्योत सिद्धू यांच्या पत्नीने सिंग यांनी नवज्योत सिद्धूविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले आहे.

नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताना ते म्हणाले, ' मी काँग्रेस सोडतोय आणि मी आता या पक्षात नाही. पण मी भाजपमध्ये प्रवेश करत नाही.'

नवा पक्ष काढण्यापूर्वी सिंग यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. भाजपसाठी सध्या उत्तर भारतातील वातावरण पोषक नाही. अशा काळात भाजपमध्ये जाणे म्हणजे राजकीय आत्मघात ठरेल असे त्यांच्या सल्लागारांनी सांगितल्याचे समजते. मात्र, शेतकरी आंदोलनात तडजोड करण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन नवा पक्ष काढावा, शिवाय निवडणुकांनंतर एकत्र यावे अशी रणनीती तयार करण्यात आल्याचे समजते.

सिंग यांनी घेतल्या होत्या भेटीगाठी

काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर माझा येथे अपमान झाला असे सांगत त्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जातील असे सांगितले जात होते. मात्र, तसे झाले नाही. सध्या सिद्धू विरुद्ध सिंग अशी लढाई राज्यात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र बंडखोर सिद्धूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांशीही फारसे पटलेले दिसत नाही.

हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news