पुढारी ऑनलाईन डेस्क: आसाममधील सोनितपूरमध्ये सोमवारी (दि.२९) सकाळी ८.०३ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १५ किमी खाली होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.
आसाममधील या भूकंपाचे धक्के शेजारील मेघालय राज्यात तसेच उत्तराखंडमध्ये देखील जाणवले आहेत, अशी माहिती एनडिटिव्हीने दिलेल्या वृत्तात सांगितले आहे.
यापूर्वी रविवारी (दि.२८) सकाळी ११.१५ वाजता जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता ६ रिश्टर स्केल होती. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्येही भूकंपाचे हलके झटके जाणवले. अफगाणमधील फैजाबादहून ७९ कि.मी.वर अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर जमिनीत २२० कि.मी. खोलवर या भूकंपाचे केंद्र होते.