नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील लोकांना मंगळवारी (दि.१६) प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागला. सकाळी सहा वाजण्यापासून सुरु झालेले धुळीचे वादळ (Dust storm) दिवसभर कायम होते. धुळीपासून वाचण्यासाठी लोकांना मास्कचा आधार घ्यावा लागला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृष्यता 1100 मीटरपर्यंत कमी झाली होती.
दिल्ली-एनसीआरमध्ये आज सकाळपासूनच हवेत धूळ आहे. या पसरलेल्या धुळीच्या चादरीमुळे हवेतील दृश्यमानताही बरीच कमी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पुढील तीन दिवस हीच स्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिल्ली IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार. दिल्लीतील हवेतील धूळ आणि दृश्यमानता अत्यंत कमी आहे. तीन दिवस हवेत धूळ काय राहणार आहे. हे धुळीचे वादळ राजस्थानातून येत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
मागील पाच दिवसांपासून दिल्लीकरांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता धुळीचे साम्राज्य (Dust storm) पसरले आहे. तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काही तासात हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दिल्लीतील नजफगड भागात सर्वाधिक ४३.९ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मंगळवारी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास इतका होता.