नाशिक : देशात २०१४ पासून सुरु झालेली मोदी लाट वाढल्याचे चार राज्यातील निवडणूक निकालांवरून दिसून आले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र मोदींचाच करिष्मा चालला. भाजपच्या बाजूने सर्व राजकारण झुकल्याचे दिसून येत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सरकार, असे प्रतिक्रिया राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी नाेंदवली आहे.
मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. रविवारी निकाल जाहीर होऊन भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ यांनी उपरोक्त मत नोंदवले. छत्तीसगड आणि राजस्थान काँग्रेसकडे होते, तिथे भाजपने आघाडी घेतली. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस येईल, असं सांगत होते. तिथे पण भाजप आलं. तेलंगणामध्ये काँग्रेस येईल, असं दिसतंय. चार पैकी तीन मोठी राज्य भाजपकडे गेली असून, हा मोदींचाच करिष्मा असल्याचे त्यांनी नमूद केले.