पुढारी ऑनलाईन डेस्क: सध्या सोशल मीडियाने जगणं व्यापलं आहे. प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनातील इव्हेटचे प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. अनेक जोडपी देखील त्यांच्या आयुष्यातील खास क्षण, प्रसंग तर काहीवेळा अगदी सहज क्लिक केलेले फोटो देखील इन्स्टाग्राम, फेसबुक या माध्यमातून पोस्ट किंवा स्टोरीवरून शेअर करतात. दरम्यान, एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जीवनात खरेच आनंदी असणारी जोडपी (couple happiness) सोशल मीडियावर कमी फोटो शेअर करतात किंवा करत देखील नाहीत. सोशल मीडिया वापराचा जोडप्यांवर काय आणि कसा परिणाम होतो यासंदर्भातील वृत्त 'इडिटोरजी'ने दिले आहे.
दक्षिण अमेरिकेतील कॅन्सस विद्यापीठातील संशोधकांनी साेशल मीडियाचा जाेडप्यांच्या जगण्यांवर काेणता परिणाम हाेताे, या संदर्भात अभ्यास करताना एक सर्वेक्षण केले. या संशोधनात 300 हून अधिक जोडप्यांनी सहभाग नाेंदवला. यावेळी सोशल मीडियाचा वापर आणि जोडीदाराच्या (couple happiness) नातेसंबंधातील आनंद यामध्ये एक दुवा आढळून आला.
सर्वेक्षणात असे आढळले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत पोस्ट करणारी जाेडपी जीवनात कमी आनंदी असल्याचा अनुभव येतो. ही जाेडपी सोशल मीडियावर नेहमी जोडीदारासोबतचे फोटो, रिल्स शेअर करतात. यामाध्यमातून ते साेशल मीडियावर सक्रीय असतात. अशा जोडप्यामध्ये स्वत:च्या नात्याची तुलना इतरांशी करण्याची प्रवृत्तीत वाढ हाेते. या तुलनेच्या प्रवृत्तीमधूनच अशा जोडप्यांमध्ये मनात नेहमी अपुरेपण आणि असुरक्षिततेची भावना निर्माण हाेते.
सतत फोटो, रिल्सच्या माध्यमातून जोडप्यांचे नातेसंबंध समोर येत असतील तर, इतर जोडप्यांकडून स्वत:च्या नातेसंबंधांशी तुलना केली जाते. सतत इतरांशी तुलना केल्याने जोडप्यांच्या नातेसंबंधावर ताण येऊ शकतो. तसेच त्यांच्यामध्ये मोठे वाद देखील निर्माण होऊ शकतात, असेही सर्वेक्षणात आढळले.
या सर्वेक्षणात असे आढळले की, "र्जी जोडपी सोशल मीडियावर इतरांच्या तुलनेत कमी फोटो, रिल्स पोस्ट करतात, ते इतरांशी स्वत:ची तुलना करत नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा ताण किंवा दबाव नसतो. त्यांना त्यांच्या आयुष्याचे प्रदर्शन करायचे नसते, त्याना कोणालाही काही दाखवायचे नसते. अशी जोडपी त्यांच्या आयुष्यात प्रामाणिक आणि खरा आनंद घेतात."
या संशोधनातून असे सुचवण्यात आले आहे की, सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक टाळून अनेक जोडपी त्यांचे नातेसंबंध निरोगी आणि आनंदी ठेवू शकतात. तसेच आपलं नातं आणखी घट्ट करू शकतात. इतरांनी निर्माण केलेल्या अभासी जीवनात अडकण्यापेक्षा जोडप्यांनी त्यांचे नात्यांमधील बंध जोपासण्यावर भर दिला पाहिजे. त्यांनी त्यांच्या जीवनातील सुंदर क्षणांची कदर करून ते साजरे करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजेत, असेही संशाेधनांनी नमूद केले आहे.