पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या अन्नात झुरळे आणि अळ्या निघाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळणार्या निष्काळजी कुलसचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनतर्फे केली आहे. विद्यापीठातील खानावळींमध्ये दर्जाहीन अन्न तयार केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणात अनेक वेळा अळ्या निघतात. अशा प्रकारामुळे विद्यापीठाचे नाव बदनाम होत आहे.
यासंदर्भात विद्यापीठामध्ये अनेक वर्षे कुलसचिवपदावर ठाण मांडून असणार्या डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडे गेले अनेक महिने आहार समिती नेमावी, कॅन्टिनच्या जेवणाच्या दर्जाची नियमित तपासणी व्हावी, स्वच्छ्तेबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी यासह कर्मचारी तसेच विद्यापीठातील अनेक समस्या अशा मागण्या विविध विद्यार्थी आणि कर्मचारी संघटना यांच्यातर्फे करण्यात येत होती; परंतु याबाबत सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करणार्या कुलसचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा न दिल्यास कुलगुरू यांनी त्यांना त्वरित निलंबित करावे; अन्यथा रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाळासाहेब जानराव, अॅड. मंदार जोशी, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी पदाधिकार्यांनी दिला आहे.
हेही वाचा