पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शनिवार, २५ नोव्हेंबर राेजी मतदान होत आहे. राज्यात आज (दि.२३) प्रचाराचा अंतिम दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राजस्थानात आहेत. जयपूर येथील एनडीएचे उमेदवार योगी श्री बालमुकुंद आचार्य यांच्या प्रचाराफेरीत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी राज्यात डबल इंजिन सरकार असल्यास राज्याचा विकास वेगाने होईल, अशी ग्वाही दिली. प्रचार फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत X सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. (CM Shinde in Rajasthan)
एकनाथ शिंदे यांनी आपल्या पाेस्टमध्ये म्हटलं आहे की, राजस्थान ही महाशूरवीर महाराणा प्रताप यांची पुण्यभूमी असून, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातून आलो असल्याचे यावेळी सांगितले. देशासह राज्याला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाचे आणि विचारांचे सरकार असणे गरजेचे असते महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार असल्याने देशातील सर्वाधिक विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत, असेही त्यांनी प्रचार रॅलीत स्पष्ट केले. (CM Shinde in Rajasthan)
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे. त्यासाठी योगी बालमुकुंद आचार्य यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन मतदारांना केल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. (CM Shinde in Rajasthan)