![Chhagan Bhujbal : आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का?](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F09%2FChhgan-Bhujbal.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इडी यापुर्वी कोणालाच माहीत नव्हती, माझ्यावर सर्वात आधी प्रयोग झाला. आता जयंत पाटील यांना चौकशीची नोटीस दिल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. आमच्या प्रांताध्यक्षांवर कारवाई होत असताना आम्ही गप्प बसायचे का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील यांनी काही चुकीचे केले नाही त्यांच्यावर कारवाई होणार नाही. भाजपाकडे लाँड्री आहे, त्यांच्याकडे जे येतात त्यांना ते स्वच्छ करतात. यंत्रणांवर दबाव टाकण्याचा आमचा हेतू नसल्याचे देखिल त्यांनी सांगितले.
नोटबंदी हा नेहमीचा खेळ आहे, कर्नाटकात निकाल लागला. त्यांनतर दोन हजारच्या नोटा बंद केल्या जात आहेत असे भाष्य केले. दुसरीकडे नोटबंदी करून किती काळा पैसा बाहेर आला, हे कळाले नाही, अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा यावेळी केली.
जागा वाटपावर कुठेही एकमत आणि चर्चा झाली नाही, नवनवीन आकडे समोर येतात. आम्ही त्यावर एन्जॉय करत आहोत. जागावाटपाबाबत कुठल्या पक्षाची कोण व्यक्ती निवडून येणार तो निकष लावला जाणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
मागील आठवड्यात झालेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेवर छगन भुजबळ म्हणाले कि, त्र्यंबकेश्वरचे गावकरी, नगरपालिकेचे काही म्हणणे नाही. पुजारी लोक सांगतात, शेकडो वर्षाची परंपरा आहे. देवाचे ऋण फेडण्यासाठी धूप दाखवितात, पूजा होते. याच मंदिरात एका चित्रपटाची शूटिंग झाली, या चित्रपटात अभिनेत्री म्हणून पार्वती खान काम करत होती. ही अभिनेत्री मंदिरात जाऊन चित्रीकरण करण्यात आले होते, मग आता असे का होते? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. मात्र हे सगळं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत आहे, कितीही पेटवा पेटवी करा, पण त्याचा उपयोग होणार नाही. 75 टक्के लोक तिथे जाणे थांबले, त्यामुळे सर्वांचे नुकसान झाल्याचेही भुजबळ म्हणाले.
हेही वाचा :