भोर : चालकाला दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने कार (एमएच 14 एचडी 3984) निरा देवघर धरणात कोसळली. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी आठच्या सुमारास शिरगाव-वारवंड हद्दीत घडली. यामध्ये एका तरुणीसह दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाच्या मृतदेहाचा उशिरापर्यंत शोध सुरू होता. अपघातातील सर्व मृत हे पुण्यातील असून, ते आयटी कंपनीमध्ये नोकरीस होते. या अपघातात गाडीतील एक जण बाहेर फेकला गेल्याने बचावला. अक्षय रमेश धाडे (वय 27, रा. रावेत, पिंपरी), स्वप्निल परशुराम शिंदे (वय 28, रा. हडपसर, पुणे), हर्षप्रीत हरिप्रीतसिंग बांबा (वय 30, रा. पाषाण; मूळ जबलपूर, मध्य प्रदेश) हे तिघे गाडीत अडकल्यामुळे मृत्युमुखी पडले. स्वप्निल शिंदेचा मृतदेह सापडू शकला नाही, तर संकेत वीरेश जोशी (रा. बाणेर, पुणे) हा गाडीतून बाहेर
फेकला गेल्याने बचावला.
वरंधा घाटमार्गे महाडकडे जाताना वारवंड-शिरगाव हद्दीतील घोडेमैदान वळणावर धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार 300 फूट खोल निरा देवघर धरणात कोसळली. गाडीत चौघे होते. त्यातील 1 तरुणी व 2 तरुण मृत्युमुखी पडले, 1 तरुण बचावला. वरील चौघे कारमधून वरंधा (ता. भोर) घाटमार्गे कोकणात ट्रेकिंगसाठी जात होते. शिरगाव-वारवंड हद्दीत अपघाताची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच भोईराज जल आपत्ती पथक, सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोर-पुणे, पोलिस उपअधीक्षक रेखा वाणी, सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सांगळे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, बाबू उंबरटकर, सुधीर दिघे, शंकर पारठे, स्थानिक ग्रामस्थ, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, हवालदार दत्तात्रय खेंगरे, उद्धव गायकवाड, विकास लगस, अतुल मोरे, सादिक मुलाणी, भीमराव रणखांबे यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. हरिप्रीत बांबा व अक्षय धाडे यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. अपघातातील जखमी तरुणावर भोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :