पुढारी ऑनलाईन डेस्क: मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्यांना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणामुळे मराठा तरुणांना मोठा फायदा होणार आहे. नोकरभरतीत मराठा तरुणांना मोठा फायदा होईल. आम्ही टिकणारं आरक्षण देण्याचं आश्वासन पूर्ण केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कायदा कोर्टातही टीकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.राज्य सरकारच्या कॅबेनिटमंत्री बैठकीनंतर, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ते आज (दि.१६) माध्यमांशी बोलत होते. (Cabinet Decision)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणावर गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस काम करत आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारी कर्मचारी सुट्टी दिवशी देखील काम करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्या मागणीचा आम्ही पुरेपूर विचार केला आहे. कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्रं देण्यात आले आहेत. अद्याप ८ लाख ४७ हजार हरकतींची छाननी सुरू आहे. सरकारनं दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली आहेत. परंतु, आरक्षणाच्या अंतिम सूचनेसाठी ४ महिने लागणार असेही ते म्हणाले. (Cabinet Decision)
घरी बसून, फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही. त्यासाठी लोकांच्यात जावे लागते. त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. आम्ही 'सरकार आपल्या दारी' यांसारखे मोठे उपक्रम राज्यात राबिवल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दिलेला शब्द पाळणारं आमचं सरकार आहे. त्यामुळे आमच्या सरकारने मराठा आरक्षणासह दिलेली सर्व आश्वासनं पाळल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.