![राहुल गांधी ( संग्रहित छायाचित्र )](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2FRahul-gandhi.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : मानहानी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अंतरिम दिलासात वाढ केली आहे. न्यायालयाने आज ( दि.१२) त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्यापासून दिलेला अंतरिम दिलासा २ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.
गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती एस व्ही कोतवाल यांच्या एकल खंडपीठासमोर झाली. ही सुनावणी पुढे ढकलत यापूर्वी राहुल गांधींना दिलेला अंतरिम दिलासा 2 ऑगस्टपर्यंत कायम राहील, असे न्यायमूर्ती कोतवाल यांनी स्पष्ट केले.
ऑगस्ट 2019 मध्ये गांधींविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू झाली होती. राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयासमोरील त्यांच्या याचिकेत दावा केला की त्यांना जुलै 2021 मध्येच याबद्दल माहिती मिळाली. गांधी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
याचिकेत राहुल गांधी यांनी म्हटले हाेते की, तक्रारदाराच्या सुप्त राजकीय अजेंडाला पुढे नेण्याच्या एकमेव उद्देशाने त्रासदायक खटल्यांचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तीची बदनामी झाली आहे त्याच्याकडूनच तक्रार केली जाऊ शकते. या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची आणि याचिकेची सुनावणी प्रलंबित असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली हाेती.
सुरतमधील न्यायालयाने राहुल गांधींना त्यांच्या "मोदी आडनाव" टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे ते खासदार म्हणून अपात्र ठरले होते. गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
हेही वाचा :