पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पक्षाच्या नियमानुसार पंतप्रधान मोदींनंतर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? असा सवाल भारतीय जनता पक्षाला केला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केजरीवालांच्या प्रश्नाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा (BJP) यांनी "निवडून येतील तर मोदीच येतील, राहतील तर मोदीच आणि भारताला मजबूत देखील मोदीच बनवतील" असे उत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले हाेते की, देशातील विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला सत्ताधारी सरकारकडून वारंवार पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? असा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो. दभाजपने एक नियम केला आहे, यानुसार नेते ७५ वर्षांचे झाले की ते पक्षातून निवृत्त होतात. याप्रमाणेच आतापर्यंत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि यशवंत सिन्हा निवृत्त झाले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये ७५ वर्षाचे होत असून, भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवालही केजरीवालांनी केला हाेता. या प्रश्नाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP) जे.पी नड्डा यांनी उत्तर दिले आहे.
केजरीवालांच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारतीय जनता पक्षाच्या घटनेत कुठेही वयाची अशी तरतूद नाही. मोदीजींचा प्रत्येक कण आणि प्रत्येक क्षण भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित आहे. हे जनतेलाही माहीत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारत'ची संकल्पना साकार होत असून, पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळात मोदीजी देशाला नव्या उंचीवर नेतील. मोदीजींच आमचे नेते आहेत आणि भविष्यातही आमचे नेतृत्व करत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
"निवडणुकीतील अपयश लक्षात आल्यानंतर केजरीवाल आणि संपूर्ण 'इंडिया' आघाडी अस्वस्थ आहे". देशाची दिशाभूल करणे आणि गोंधळ घालणे हा त्यांचा उद्देश आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मोदीजींना जनतेचे अतोनात आशीर्वाद मिळत आहेत. त्यांच्याकडे पंतप्रधान मोदींप्रमाणे कोणते धोरण नाही की, कोणता ठाेस कार्यक्रम नाही. त्यामुळेच ते मोदीजींच्या वयाची सबब पुढे करून मार्ग काढत असल्याची टीका त्यांनी केजरीवालांवर केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'भाजपचा विजय झाल्यास अमित शहा हेच पंतप्रधान होतील' या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "मी अरविंद केजरीवाल आणि इंडी कंपनीली सांगू इच्छितो की, "भाजपच्या घटनेत असे काहीही नमूद केलेले नाही. मोदी पुढील ५ वर्षाचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार आहेत आणि भविष्यातही पंतप्रधान मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील. त्यामुळे भाजपमध्ये कोणताही गोंधळ नसल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे".
हेही वाचा: