नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
आधारकार्डची मतदान ओळखपत्राला जोडणी ( Aadhaar-Voter ID ) करण्याबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाला देणारे विधेयक सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षांच्या प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे.
केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयक या नावाने सदर विधेयक सादर केले. सदनात यावेळी गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेणी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांचा गदारोळ सुरु होता. गोंधळातच आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झाले. मतदार यादीत दोन ठिकाणी नावे असलेल्यांना शोधून काढणे तसेच बोगस मतदान रोखणे यासाठी आधारकार्डची मतदान ओळखपत्रासोबत जोडणी केली जाणार आहे. निवडणूक सुधारणा अन्यही काही महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असल्याचे रिजिजू यांनी चर्चेदरम्यान सांगितले. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी विधेयकाला विरोध केला तर काही सदस्यांनी संसदीय समितीकडे हे विधेयक पाठविण्याची मागणी केली.
दरम्यान आर्थिक गुन्हे करून विदेशात पळून गेलेल्या लिकर किंग विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांची 13 हजार 109 कोटी रुपयांची संपत्ती ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली.
हेही वाचलं का?