पुढारी ऑनलाइन डेस्क : Bill Gates meets PM Modi : बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी शुक्रवार ३ मार्च रोजी भारत दौरा केला. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बिल यांनी आरोग्य आणि हवामान बदलासह विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीबद्दल भारताचे मोठे कौतुक केले. भारताच्या प्रगतीबद्दल आपण आता पूर्वीपेक्षा अधिक आशावादी आहे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर बिल गेट्स (Bill Gates meets PM Modi) यांनी शनिवारी ब्लॉगमध्ये या भेटीचे वर्णन केले. "ज्यावेळी जगासमोर अनेक आव्हाने आहेत, अशा वेळी भारतासारख्या गतिमान आणि सर्जनशील ठिकाणी भेट देणे प्रेरणादायी आहे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवरून बिल गेट्स यांना भेटून त्यांच्यासोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. याचा मला खूप आनंद झाला आहे, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसंदर्भात गेट्स यांनी लिहिले आहे, माझ्या भारत भेटीचे मुख्य आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारची भेट. ते त्यांच्या वेळेबद्दल उदार होते, कारण आम्ही भारतातील विषमता कमी करण्यासाठी जगभरातील विज्ञान आणि नवकल्पना कशी मदत करू शकतात याबद्दल बोललो. तसेच आम्ही आरोग्य, हवामान बदल आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील नवीन कार्य यावर विस्तृत चर्चा केली." तसेच त्यांनी यावेळी कोरोना महामारीमुळे तीन वर्षात जास्त प्रवास केला नसला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी संपर्कात राहिलो. विशेषतः या काळात आम्ही कोविड 19 लस विकसित करण्याबाबत आणि भारताच्या आरोग्य प्रणालींमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होतो, असेही ते म्हणाले.
बिल गेट्स यांनी आरोग्य, विकास आणि हवामान यांसारख्या क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीचे कौतुक केले आणि नाविन्यपूर्ण गुंतवणूक केल्यावर काय शक्य आहे हे देश दाखवत असल्याचे सांगितले. "भारतात अनेक सुरक्षित, प्रभावी आणि परवडणाऱ्या लसींची निर्मिती करण्याची अद्भुत क्षमता आहे, त्यापैकी काहींना गेट्स फाऊंडेशनचे समर्थन आहे. भारतात उत्पादित केलेल्या लसींनी साथीच्या रोगाच्या काळात लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि जगभरातील इतर आजारांना प्रतिबंध केला आहे," असेही गेट्स म्हणाले.
कोविड महामारीच्या काळात भारताने राबवलेल्या लसीकरण कार्यक्रमाने बिल हे प्रभावित झाले आहे. बिल यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, नवीन जीवन वाचवणारी साधने तयार करण्याव्यतिरिक्त, भारत त्यांना वितरित करण्यातही उत्कृष्ट आहे—तिच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीने कोविड लसींचे २.२ अब्जाहून अधिक डोस वितरित केले आहेत. भारताने या लसीकरण मोहिमेसाठी तयार केलेले को-विन प्लॅटफॉर्म खरोखरच उत्कृष्ट आहे. यामुळे अब्जावधी लोकांना लसी देण्यासाठीचे नियोजन करणे, तसेच त्याचे प्रमाणपत्र वितरीत करणे हे खूपच सूलभतेने शक्य झाले आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे की को-विन हे जगासाठी एक मॉडेल आहे आणि मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे.
याशिवाय त्यांनी भारताने क्षयरोग, व्हिसेरल लेशमॅनियासिस आणि लिम्फॅटिक फिलेरियासिस यांसारख्या प्राणघातक आणि दुर्बल आजारांना दूर करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांबद्दल मी पंतप्रधानांचे कौतुक केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतात आकार घेत असलेल्या नवीन 'दत्तक' चळवळींबद्दल सांगितले. एक समुदाय टीबी रुग्णांना आवश्यक तो पोषण आणि काळजी मिळते की नाही याची खात्री करण्यासाठी दत्तक घेत आहे. तसेच भारताने एचआयव्हीबाबतही असाच दृष्टिकोन वापरला आहे आणि त्याचे चिरस्थायी परिणाम दिसून आले आहेत, असे गेट्स यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
याशिवाय बिल गेट्स यांनी मोदींसोबत G20 अध्यक्षपदावर चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात विकसित केलेल्या नवकल्पनांचा जगाला कसा फायदा होऊ शकतो हे अधोरेखित करण्याची आणि इतर देशांना त्यांचा अवलंब करण्यास मदत करण्याची ही एक उत्तम संधी आहे, असे म्हटले. नंतर शेवटी हवामान बदल स्वच्छ ऊर्जा आदी मुद्द्यांवर चर्चा केली.
हेही वाचा :