पुणे : पुढारी वृत्तसेवा : एखादं कटींगच दुकान उघडल तरी पोलिसांना कळतं, जे आहे ते सांभाळता आलं नाही आता तुम्हाला 14 दिवसांची पोलिस कोठडी कशाला हवी ? असे म्हणत ललित पाटील पलायन प्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए सी बिराजदार यांनी मिश्किल टिप्पणी केली. दरम्यान सरकारी आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
नेपाळ सीमेजवळील बाराबंकी-गोरखपूर रोड येथून ताब्यात घेतलेल्या ड्रग तस्कर भूषण अनिल पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांना आज कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा मुख्य आरोपी ललित पाटील मात्र अद्यापही फरारच आहे.
भूषण आणि अभिषेक हे दोघे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापूर्वीच दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दोघांना रात्री उशिरा पुण्यात आणण्याची प्रक्रिया पार पडली. भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक या दोघांचा शोध पोलिस घेत होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे केलेल्या तपासात भूषण आणि अभिषेक हे दोघे उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना कळविले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या सर्व घटनेवर पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे स्वतः लक्ष ठेवून होते. दोन्ही आरोपी मिळाल्याचे समजल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त सुनिल तांबे आणि त्यांचे पथक उत्तर प्रदेशात गेले. रात्री उशिरा दोघांना पुण्यात आणण्यात आले.
हेही वाचा :