वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : मोबाईलच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त करीत युनेस्कोने जगभरातील शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यास बंदी घालावी, असे आवाहन केले आहे. स्मार्टफोनचा अतिवापर होत असल्याबाबत युनोस्कोचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. युनेस्कोचे प्रमुख मॅनोस अँटोनिनिस यांनी या अहवालात म्हटले आहे की, मोबाईल फोनचा अतिवापर होत असल्याने मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे जगातील सर्व?शाळांमध्ये यावर बंदी घालायला हवी. शाळेत तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो, याची माहिती घेण्याची गरज आहे. जगातील केवळ 16 टक्के देशांनी डाटा प्रायव्हसीची हमी दिली आहे. त्यामुळे वैयक्तिक डाटा लिक होण्याचा धोका आहे. स्मार्टफोनमधील डाटावर नियंत्रण हवे. या डाटाचा बिगर शैक्षणिक कारणासाठी वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानासह आणि तंत्रज्ञानाशिवाय जगण्याची सवय लावली पाहिजे. यातून त्यांना तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे समजून येतील, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच स्मार्टफोनचा वापर केला जाईल, अशी यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे. शाळांनी यासाठी पुढाकार घ्यावा. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांनी यामध्ये समतोल साधण्यासाठी यंत्रणा तयार केल्या आहेत. शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आर्टिफिशिएल इंटेलिजन्सचे महत्त्व वाढत असल्याने डिजिटल साक्षरता वाढण्याची गरज आहे. काही देशांत अद्यापही शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्याचे दिसून येते, असे निरीक्षणही या अहवालात नोंदविले आहे.
कोरोनाच्या काळात डिजिटल लर्निंगचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. या ऑनलाईन लर्निंगमुळे जगभरात 50 कोटी विद्यार्थ्यांना झळ पोहोचली आहे. यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचलंंत का ?