श्रीकांत बोरावके
आळंदी :
भेटी लागे जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥1॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
तैसें माझें मन वाट पाहें ॥2॥
पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या भेटीसाठी कैवल्याचा पुतळा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमीला आज रविवारी (दि. 11) सायंकाळी चार वाजता प्रस्थान होणार आहे. हा सोहळा 'याची देही याची डोळा' अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. देवस्थान, पालिका आणि पोलिस प्रशासन सोहळ्यासाठी सज्ज झाले असून, मंदिरात पुष्पसजावटीची लगबग सुरू आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा बसविण्यात आली असून, पासधारक व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे.
प्रस्थानदिवशी पहाटे चार ते साडेपाच घंटानाद, काकडा आरती व पवमान अभिषेक होईल. सकाळी नऊ ते अकरा वीणा मंडपात कीर्तन होईल. दुपारी बारा ते साडेबारा मंदिर गाभारा स्वच्छ करण्यात येईल व समाधीस पाणी घालण्यात येईल व श्रींना महानैवेद्य, दुपारी चार वाजता प्रस्थान कार्यक्रमास सुरुवात होईल. श्रीगुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती, संस्थानातर्फे श्रींची आरती करण्यात येईल. त्यानंतर प्रमुख मानकर्यांना नारळ प्रसाद वाटप, वीणा मंडपात श्रींच्या चलपादुका आणल्या जातील.
संस्थानातर्फे मानकर्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येईल. श्रीगुरू हैबतबाबा तर्फे प्रतिनिधी, दिंडीप्रमुख, प्रतिष्ठित मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात येईल. पादुकांचे वीणा मंडपातून प्रस्थान व मंदिर प्रदक्षिणा करून दर्शन मंडप हॉल, गांधी वाडा येथे विराजमान करण्यात येतील. समाज आरती आणि रात्री अकरा ते पहाटे साडेचार जागराचा कार्यक्रम होईल. सोमवारी (दि.12) सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.
हेही वाचा