पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या 40 दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहत आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. आज (दि.२३) सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे 'चांद्रयान' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. भारताच्या या चांद्रयान मोहिमेनिमित्त अन्य देशातील चांद्र मोहिमांबद्दल थोडेसे जाणून घेऊ.
अमेरिकेने चंद्रावर मानवाला पाठवण्याची मोहीम हाती घेतली. त्यानंतर अमेरिकेने राबवलेल्या अपोलो मोहिमेत नील आर्मस्ट्रांगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि एक इतिहास घडला. पण नीलचा सहकारी आल्ड्रिन हा चंद्रावर उतरणारा पहिला मानव ठरला असता पण…जाणून घ्या काय आहे तो किस्सा. (Apollo 11- Buzz Aldrin)
२० जुलै रोजी (भारतीय वेळेनुसार २१ जुलै) चंद्राला दहावी परिक्रमा केल्यानंतर यानाचा चालक नील आर्मस्ट्रॉंगने अपोलो यानाचा (कोलंबिया) दरवाजा उघडला आणि एका बोगद्यातून ईगल या त्याला जोडलेल्या छोट्या यानात जाऊन पोहोचला. त्याच्या आदल्या दिवशीही त्याने इगलमध्ये जाऊन तेथील सर्व यंत्रे योग्य काम करतात की नाही हे पाहिले होते. इगलचे पोटात घेतलेले पाय उघडतात की नाही याचीही त्याने चाचणी घेतली होती. कारण प्रत्यक्ष हेच यान चंद्रावर उतरणार होते. नीलनंतर आल्ड्रिन इगलमध्ये आला. तिसरा अंतराळवीर मायकल कॉलिन्स मात्र यानातच राहिला.
तिसरा अंतराळवीर कॉलिन्स हा कोलंबियामध्येच थांबून पृथ्वीप्रदक्षिणा करीत राहिला. दोन तास नऊ मिनिटांनी 'ईगल'चंद्रावरील 'सी ऑफ ट्रँक्विलिटी'या पूर्वनियोजित जागेवर अलगद उतरले तेव्हा अवघे २५ सेकंदांचे इंधन त्यात शिल्लक राहिले होते. म्हणजे चंद्रावर उतरायला त्यांना अर्ध्या मिनिटाचा उशीर झाला असता, तरी 'ईगल' चंद्रावर आदळून अंतराळवीरांचा अंत झाला असता.
दरम्यान, सायंकाळी साडेसहा ते रात्री अकरापर्यंत आल्ड्रिनने यानाची संपूर्ण चाचणी घेतली. अपोलोच्या साथीनेच चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत राहिले. अकरा वाजून सतरा मिनिटांनी इगल अपोलोपासून वेगळे झाले. हे यान वेगळे झाल्यानंतर आर्मस्ट्रॉंगने गरूडाला (इगल) पंख फुटले, असा संदेश पृथ्वीवर पाठविला. 'ईगल'चा दरवाजा उघडून शिडीच्या नऊ पायऱ्या उतरून नील आर्मस्ट्राँग चंद्राच्या भूमीवर उतरले.
पृथ्वीवासीय मानवाचे ते चंद्रावरचे पहिले पाऊल ठरले. आर्मस्ट्राँग यांचे उद्गार होते : 'माणसाचे एक छोटे पाऊल.. पण मानवजातीची एक प्रचंड झेप!' (One small step for man, one giant leap for mankind.) हे त्यांचे उद्गार अवकाश इतिहासात अजरामर झाले आहेत. आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे, आणि आल्ड्रिन हे दोन तास १७ मिनिटे चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. या काळात त्यांनी माती अन्य घटकांची चाचपणी केली. त्यावेळी 'ह्यूस्टन, ट्रँक्विलिटी बेस हिअर, ईगल हॅज लॅन्डेड' हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून दिला गेला आणि इतिहास घडला. २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे अपोलो ११ हे अंतराळयान चंद्रावर उतरलं आणि हा ऐतिहासिक क्षण साऱ्या जगाने आपल्या टिव्हीवर बघितला. मानवाचे हे अवकाशारोहण जगातील दोन दशलक्ष लोकांनी टीव्हीद्वारे पाहून डोळ्यात साठवून ठेवले.
चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून सारं जग नील आर्मस्ट्राँग यांना ओळखतं. पण चंद्रावर पाऊल टाकण्याचा पहिला मान खरं तर मिळणार होता तो अपोलो मिशनचे पायलट एडविन सी. आल्ड्रिन यांना. ते अमेरिकन एअरफोर्समध्ये कार्यरत होते, त्यांना अवकाश मोहीमेचा अनुभव पण होता आणि म्हणूनच त्यांची या चांद्रमोहिमेसाठी पायलट म्हणून निवड झालेली होती. तर नील आर्मस्ट्राँग हे अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होते. या मोहिमेत ते सहवैमानिक होते. मोहिमेच्या आखणीनुसार आल्ड्रिन यांनी चंद्रावर पायलट म्हणून प्रथम उतरावं असं ठरलं होतं. जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरलं, तेव्हा त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोलमधून उतरण्यासाठी तसा आदेशही मिळाला.
पण एडविन थबकले, त्यांच्या मनात अनेक शंकांनी घेर धरला. त्यांच्या मनात हा गोंधळ चालू असतानाच अगदी काही क्षणातच पुढला आदेश आला, तो होता आर्मस्ट्राँग यांच्यासाठी. कोणताही विचार न करता नील आर्मस्ट्राँग यांनी चांद्रभूमीवर पहिलं पाऊल टाकलं आणि अशा प्रकारे चंद्रावर पाऊल ठेवणारे ते पहिले मानव ठरले. पण आल्ड्रिन यांना त्याची जराही खंत नाही. ते म्हणण्यानुसार, 'कमांडर या नात्याने नीललाच तो मान मिळायला हवा होता. आपल्याला त्याचे अजिबात शल्य वाटत नाही.'
अपोलोच्या एकूण अवकाश मोहिमेसाठी जवळजवळ ३० अब्ज डॉलर खर्च आला. चंद्राची वारी केलेल्या अंतराळवीरांनी सुमारे ३६५ किलो वजनाचे चंद्रावरील मातीचे आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले. अनेक देशांच्या वस्तुसंग्रहालयांना तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळांना अभ्यासासाठी आणि लोकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी त्यातले काही तुकडे भेट म्हणून देण्यात आले. अमेरिकेच्या 'अपोलो'नंतरच्या अवकाश मोहिमेसाठी – म्हणजे 'स्कायलॅब'या अवकाशस्थानकासाठी (स्पेस स्टेशन) अपोलो यानाकरिता विकसित केलेल्या घटकांचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला.
अपोलो-११ या यानाने नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन आल्ड्रिन चंद्रावर उतरले. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच चंद्रावर मानवी पाऊल पडले. या मोहिमेपूर्वी चंद्रासारखा पृष्ठभाग असलेल्या अमेरिकेतील अरिझोना उल्कापात विवर, सनसेट विवर येथे चांद्रवीरांनी सराव केला होता. ग्रीक पुराणातील प्रकाशाची देवता असलेल्या झिअसच्या पुत्राचे नाव अपोलो होते त्यावरून या मोहिमेला अपोलो असे नाव देण्यात आले होते.
चंद्राचा प्रवास करायचा तर ती मरणयात्राच होती. चंद्र पृथ्वीपासून किती दूर आहे? तर ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. हा प्रवास त्या तीन चांद्रवीरांनी अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केला. गणित मांडून पाहा, चांद्रयान किती वेगाने गेले असेल? जेव्हा ते चांद्रवीर चंद्रावर उतरले तेव्हा ते चंद्रावर स्थिरपणे चालू शकत नव्हते.
ते चंद्रावर अडीच तास होते. त्या काळात ते चंद्रावर जणू उडय़ा मारतच चालत होते. कारण चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे व तिथे हवा नाही. त्या चांद्रवीरांनी ऑक्सिजन सोबत नेला होता. त्या अडीच तासात त्यांनी चांद्रभूमीवर अनेक प्रयोग केले. त्यांनी पृथ्वीवर परतताना सोबत ३८० किलो दगडमाती आणली. त्याचे संशोधन आजही चालू आहे.
२४ जुलै १९६९ रोजी परतीचे वाहन 'कोलंबिया मोडय़ुल' पृथ्वीवर परतले. अपोलो-११ मोहीम यशस्वी झाली व अध्यक्ष केनेडी यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्या अगोदर २७ जानेवारी १९६७ मध्ये अपोलो मोहिमेतील चांद्रवीर मरण पावले होते. अपोलो-१ सुद्धा उतरवताना गडबड होत आली होती, पण अवघ्या २० सेकंदांपुरते इंधन राहिले असताना ते सुखरूप उतरले. आर्मस्ट्राँग यांना जिवंतपणी दंतकथा बनण्याचे भाग्य लाभले.
चंद्रावर पहिलं पाउल नील आर्मस्ट्राँगने २० जुलै रोजी ठेवलं. चंद्र मोहिमेवरून परत आल्यानंतर आर्मस्ट्राँगने जगभर प्रवास केला होता. त्यावेळी दिल्लीत इंदिरा गांधी यांचीही भेट घेतली होती. या भेटीवेळी नटवर सिंग उपस्थित होते. तेव्हा नटवर सिंग यांनी नील आर्मस्ट्राँगला सांगितलं की, चंद्रावर पहिलं पाऊल टाकत असलेला क्षण पाहण्यासाठी भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी ४.३० वाजेपर्यंत जाग्या राहिल्या होत्या. नील आर्मस्ट्राँगला सांगण्यात आलं तेव्हा यासाठी त्यानं दिलगिरी व्यक्त केली होती.
दुसरे महायुद्धाचा शेवट होत आलेला. याच दरम्यान २ मे १९४५ ला वॉनर वॉन ब्रॉन नावाच्या नाझी-जर्मन वैज्ञानिकाने अमेरिकी सैनिकांसमोर आत्मसमर्पण केले. अमेरिकेने त्याला बंदी केले. ते ब्रॉनला घेऊन अमेरिकेला गेले. ब्रॉनने अमेरिकेत बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रमात सहभा घेत काम सुरू केले.
हेही वाचा