पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र आघाडीतील पक्षांच्या नेत्यांमधील 'मनभेद' वारंवार चव्हाट्यावर आलेले आहेत. आता मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी केली नसल्याने समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव भडकले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल करत षडयंत्र रचू नका, आमच्यासोबत आघाडी करायची नसेल तर स्पष्ट सांगा, असा इशारा दिला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, "काँग्रेसने आमच्यासोबत युती केली नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही आमची तयारी करू. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससोबत आघाडी होणार नव्हती तर आमच्या नेत्यांना का बोलावण्यात आले हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असेही त्यांनी सुनावले.
इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी आहे, राज्यांसाठी नाही, असे स्पष्टपणे सांगायला हवे होते; पण आमच्या नेत्यांना बोलावून आमच्याशी चर्चा करून जागांची संपूर्ण माहिती घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीत आघाडी करायची की नाही, हे काँग्रेसने स्पष्टपणे सांगावे, असे ते म्हणाले. त्यांनी नकार दिल्यास भाजपला पराभूत करण्यासाठी आमची तयारी करू. काँग्रेसने आमच्याविरुद्ध षडयंत्र रचू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
जेव्हा काँग्रेस कमकुवत होईल तेव्हा समाजवाद्यांची गरज भासेल, या समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या विधानाचे स्मरणही त्यांनी यावेळी करुन दिले. यापूर्वी काँग्रेस नेते अजय राय यांनी समाजवादी पार्टीवर बोचरी टीका केली होती. ज्याला अखिलेश यादव यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून विरोधी पक्ष भारतातील सपाच्या उपस्थितीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
हेही वाचा :