नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची तिहार तुरुंगात हत्या केली जाऊ शकते, अशी भीती आम आदमी पक्षाने व्यक्त केली आहे. सिसोदिया यांना तुरुंगात पाठविण्यामागे मोठे षडयंत्र असून मुद्दामहून त्यांना तुरुंग क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले असल्याचे आप प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सहसा पहिल्यांदा आरोप झालेल्या लोकांना तिहारमधील प्रथम क्रमांकाच्या तुरुंगात ठेवले जात नाही. कारण या तुरुंगात अतिशय धोकादायक आणि हिंसक गुन्हेगारांना ठेवले जाते. कोणाच्या तरी इशाऱ्यावरून हे कैदी कोणाचीही हत्या करू शकतात, अशा स्थितीत सिसोदिया यांना प्रथम क्रमांकाच्या तुरुंगात ठेवण्यामागच्या कारणांचा उलगडा होऊ शकतो, असे भारद्वाज यांनी सांगितले. भाजप ही आमची राजकीय प्रतिस्पर्धी आहे, पण राजकारणात अशा स्वरूपाचे शत्रुत्व असते काय? असा सवालही भारद्वाज यांनी उपस्थित केला.