अनाथ मुलाची नेपाळ ते नागपूर भटकंती; पोलिसदादाच्या भेटीने गवसली जगण्याची दिशा | पुढारी

अनाथ मुलाची नेपाळ ते नागपूर भटकंती; पोलिसदादाच्या भेटीने गवसली जगण्याची दिशा

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा माता-पित्याचे छत्र अपघातात गमावले, नातेवाईकांनी साथ सोडली. अशा अवस्थेत भुकेने व्याकूळ झालेला एक मुलगा नेपाळच्या काठमांडू रेल्वेस्थानकावर गेला. तेथून इकडे-तिकडे भटकत तो थेट नागपुरात पोहाेचला. नागपुरातील इतवारी रेल्वेस्थानकावर त्याला पोलिसदादा भेटला आणि जगण्याची नवी दिशा त्‍याला गवसली.

नेपाळमधून ताे अनाथ मुलगा असा पाेहाेचला नागपुरात

नेपाळमधील एका खेड्यात राहणाऱ्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या (१४ वर्षीय) अनाथ मुलाची ही कैफियत. नागपुरातील लकडगंज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि आता शासकीय मदतीतून त्याची निवास आणि शिक्षणाची व्यवस्थाही करून दिली आहे. मुरलीचे (बदललेले नाव) आईवडील सायकलने मजुरीला जात असताना एका ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनीही मुरलीला आधार दिला नाही. भुकेने व्याकूळ अवस्थेत काठमांडू रेल्वेस्थानक आणि पुढे मिळेल त्या रेल्वेतून प्रवास करीत चार दिवसांपूर्वी नागपुरातील इतवारी रेल्वेस्थानकावर तो पोहोचला.

रात्री तो फलाटावर झोपलेला दिसल्याने दोन पोलिसांनी त्याला विचारणा केली. भूक लागल्याचे सांगताच एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःचा जेवणाचा डबा दिला. दुसऱ्या दिवशी तो रेल्वेस्थानकाच्या बाजूच्या मैदानावर गेला. क्रिकेट खेळणाऱ्या मुलातील एकाने त्याला खेळण्यासाठी बोलावले. दिवसभर मैदानावर मुलांमध्ये मिसळला. पाच दिवसांपासून रात्री रेल्वे फलाटावर झोपणे आणि दिवसा मुलांसोबत मैदानावर खेळणे, अशी त्याची दिनचर्या सुरू होती. खेळणाऱ्या एका मुलाने मुरलीला आईसक्रीम दिले आणि बोलते केले. तेव्हा त्याने अनाथ असल्याचे सांगितले. मुलाने ही माहिती आपल्या हॉटेल व्यवसायी असलेल्या वडिलांना दिली. दोघेही बापलेक मैदानावर गेले. मुलाने मुरलीला घरी नेण्यासाठी हट्ट धरला. त्यानेही होकार दिला. त्याला दोन दिवस घरी ठेवले. मात्र, कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी लकडगंजचे ठाणेदार वैभव जाधव यांना यासंदर्भात लगेच अवगत केले.

अन् ‘त्‍या’ मुलाला मिळाली जगण्याची नवी दिशा

ठाणेदार वैभव जाधव यांनी मुरलीला नवीन कपडे दिले व लगेच बाल कल्याण समितीशी संपर्क साधला. मुरलीची कायदेशीररित्या शिक्षण आणि निवाऱ्याची व्यवस्था करून दिली. आता नव्या शैक्षणिक सत्रापासून जुलैपासून नेपाळचा अनाथ मुरली नागपुरातील एक ना अनेक पालकांच्या पाठबळावर शाळेत जाणार असून इतरांनाही नाउमेद न होता जगण्याची प्रेरणा देणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button