Holi 2024 : लडाख भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी : राजनाथ सिंह | पुढारी

Holi 2024 : लडाख भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी : राजनाथ सिंह

पुढारी ऑनलाईन डेस्क : “लडाख हा भारत मातेचा चमकणारा मुकुट आहे. ते राष्ट्रीय संकल्पाचे प्रतिनिधित्व करते. जशी देशाची राजकीय राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई आणि तांत्रिक राजधानी बेंगळुरू आहे. त्याचप्रमाणे लडाख ही शौर्य आणि पराक्रमाची राजधानी आहे,” असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

लेहमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (दि.२४) सशस्त्र दलाच्या जवानांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवनांना संबोधित केले.  त्यांच्यासोबत लष्करप्रमुख मनोज पांडेही होते. राजनाथ सिंह यांनी लेह येथील ‘हॉल ऑफ फेम’ येथे देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनंतर सैनिकांसोबत होळी साजरी केली. दरम्यान, राजनाथ सिंह जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथेही सैनिकांसोबत होळी साजरी करणार होते. मात्र हवामानातील बदलामुळे त्यांना सियाचीन दौरा बदलावा लागला.

लेह येथे बोलताना मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सैनिकांसोबत सण साजरे करणे हा संस्कृतीचा भाग बनला पाहिजे. कारगिलच्या बर्फाच्छादित शिखरांवर, राजस्थानच्या धुमसत असलेल्या वालुकामय मैदानात, खोल समुद्रात असलेल्या पाणबुड्यांमध्ये, या ठिकाणी सर्वप्रथम प्रत्येक वेळी सण साजरे केले पाहिजेत, असे ते म्हणाले.

“दिवाळीचा पहिला दिवा आणि होळीचा पहिला रंग हा आपल्या सैनिकांसोबत असावा. सर्व सण आधी सियाचीन आणि कारगिलच्या शिखरांवर साजरे केले पाहिजेत. या दऱ्याखोऱ्यांत जेव्हा थंडगार वारे वाहतात, तेव्हा प्रत्येकाला आपापल्या घरात राहावेसे वाटते, अशा परिस्थितीतही तुम्ही हवामानाला तोंड देत उभे राहता. या अतूट इच्छाशक्तीच्या प्रदर्शनासाठी देश सदैव तुमचा ऋणी राहील. येणाऱ्या काळात जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुमच्या शौर्याचे कृत्य अभिमानाने स्मरणात राहील. शत्रूंपासून आमचे रक्षण करणारे तुम्ही सर्व सैनिक आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही. तुमच्यामुळेच देशातील लोक शांततेने होळी साजरी करू शकतात, असे राजनाथ सिंह म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button