कंगाल पाकिस्‍तानची मदतीसाठी भारताकडे ‘नजर’ : परराष्‍ट्र मंत्री दार म्‍हणाले… | पुढारी

कंगाल पाकिस्‍तानची मदतीसाठी भारताकडे 'नजर' : परराष्‍ट्र मंत्री दार म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादाला खतपाणी घालत नेहमीच भारताविरोधात कुरघुड्या करणार्‍या पाकिस्‍तान सध्‍या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्‍थिती पाकिस्‍तानला भारताचे स्‍मरण झाले आहे. परराष्‍ट्र मंत्री इशाक दार (Pakistani Foreign Minister Ishaq Dar) यांनी नुकत्‍याच केलेल्‍या विधानामुळे पाकिस्‍तानला आता भारताबरोबरील संबंधात बदल हवा असल्‍याचे संकेत मिळत आहेत.

काय म्हणाले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री?

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध ऑगस्ट 2019 पासून ठप्प झाले आहेत. हे संबंध पूर्ववत करण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल.”

पाकिस्तानी व्यावसायिकांना भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करायचाय

दार यांनी ब्रुसेल्समधील अणुऊर्जा शिखर परिषदेत भाग घेतला, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतासोबत व्यापारी उपक्रम सुरू करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, पाकिस्तानी व्यावसायिकांना भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करायचा आहे. पाकिस्तान भारतासोबत व्यापारी संबंध पूर्ववत करण्याचा गांभीर्याने विचार करेल, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले. (Pakistani Foreign Minister Ishaq Dar)

इशाक दार यांनी दिले राजनैतिक भूमिका बदलण्याचे संकेत

इशाक दार यांनी केलेले विधान हे आर्थिक कंबरडे मोडलेल्‍या पाकिस्तान भारताबाबत आता राजनैतिक भूमिका बदलण्याचे संकेत मानले जात आहे. भारताने ऑगस्‍ट २०१९ मध्‍ये जम्‍मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देण्‍यात आलेले घटनेतील कलम 370 रद्द केले. यानंतर जम्मू-काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजनही झाले. तेव्‍हापासून पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध कमी केले आहे.

अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेहबाज शरीफ यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले होते. शरीफ यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत. 8 फेब्रुवारीच्या निवडणुकीनंतर शरीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सत्तेवर आले. शरीफ सरकारसमोर देशाची अर्थव्यवस्था सुधारण्‍याचे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button