Nashik News : ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपालांचा विद्यार्थ्यांना सल्ला | पुढारी

Nashik News : ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपालांचा विद्यार्थ्यांना सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, जीवनाचा शेवट नाही. त्यामुळे अपयशामुळे खचू नका. जगातील यशस्वी लोकांच्या जीवनाचा प्रवास पाहिल्यास समजते की, अपयश हे त्यांच्या जीवनाचादेखील एक भाग आहे. पण, त्यांनी त्या अपयशाला संधी म्हणून स्वीकारले आणि त्याच संधीच्या बळावर त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे ध्येय ठरवताना अपयशी होण्यास घाबरू नका, असा मोलाचा सल्ला राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शहरातील एका विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल बैस म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे तयार केले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना केली आहे. नवीन शैक्षणिक धोरण प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान आणि विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित आहे. भारताच्या सुवर्ण युगाची सुरुवात करण्यात आजची युवा पिढी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी विविध क्षेत्रांची कवाडे खुली झाली आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत आणि अभ्यासाप्रति समर्पण आज ज्या स्थानावर घेऊन गेले आहे. त्याचे श्रेय विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या प्राध्यापक आणि पालकांना जाते. तसेच निरोगी आयुष्य जगण्यासाठी करिअरबरोबरच मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला.

हेही वाचा :

Back to top button