जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक | पुढारी

जळगाव : दुचाकीच्या चावीवरून तरुणाची हत्या; तिघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

दुचाकीची चावी हरवल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शहरातील खोटेनगर बसथांब्याजवळ मंगळवारी (दि. 6) रात्री घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (दि. ७) मृत्यू झाला. अविनाश निंबा अहिरे (३५, रा. कुसुंबा) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

कुसुंबा येथील अविनाश अहिरे हा खोटेनगरातील बसथांब्याजवळील अंडाभुर्जीच्या हातगाडीवर मोटारीने (एमएच १९, डीए ०४५१) आला. तेथे दीपक प्रकाश पाटील (रा. पिंप्राळा) याच्यासह अन्य दोघे मित्र आले. अविनाशची दुचाकी दीपककडे होती. दुचाकीच्या चावीची विचारणा केल्याने शाब्दिक वाद वाढत गेला. दीपकसह अन्य दोघांनी धारदार शस्त्र भोसकल्याने अविनाश गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सकाळी अविनाशचा मृत्यू झाला. पोलिसांनी दीपक पाटील, साहील खान, अमोल गवई या तिघांना अटक केली. अविनाश अहिरे याच्या खून प्रकरणी महेश पोपट सोनवणे (रा. चंदूअण्णानगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button