पुढारी ऑनलाईन : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरमधील रहिवाशांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्वांनी अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा, अशी प्रशासनाकडून वारंवार सूचना केली जात आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्याप्रकरणी तीन दिवसांमध्ये २२ जणांना १.१ लाख रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. बंगळूर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाने (BWSSB) ही धडक कारवाई केली आहे. ( Bengaluru water crisis)
तीव्र पाणी टंचाईमुळे बंगळूर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाने 10 मार्च रोजी एक नोटीस जारी केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या वापराच्या प्रत्येक उल्लंघनासाठी 5,000 रुपयांच्या दंड आकारण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले होते. कार धुणे, बागकाम आणि मोठे बांधकाम प्रकल्प आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच जनजागृती करून शुक्रवार, २२ मार्चपासूनच निर्बंधांच्या आदेशांची अंमलबजावणी सुरू केली आहे. ( Bengaluru water crisis)
पाण्याच्या वापरासंदर्भातील नियमांचा उल्लंघन केल्या प्रकरणी २४ मार्चपर्यंत एकूण 22 प्रकरणे नोंदवली गेली. नागरिकांकडून थेट स्पॉट दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांना वाहतूक पोलिसांप्रमाणे पावत्या दिल्या आहेत, अशी माहिती BWSSB चे अध्यक्ष व्ही राम प्रसथ मनोहर यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली.
काही जण थेट नळांना जोडलेल्या फवारण्या गाडी धुण्यासाठी वापरत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. सर्व प्रकरणे आमच्या जागेची तपासणी आणि स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींवर आधारित आहेत. आम्ही आमची मोहीम सुरू ठेवू, असेही मनोहर यांनी स्पष्ट केले आहे. ( Bengaluru water crisis)
कमी पावसामुळे यंदा बंगळूरमधील अनेक बोअरवेल कोरडी पडली आहे. यामुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षणाचे सेवानिवृत्त उपमहासंचालक एचएसएम प्रकाश यांनी, २०२४ च्या मान्सून हंगामातही कमी प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. २०२४ मध्ये मान्सून पर्जन्यमान कमी होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, २०२३ मध्ये कमी झालेला पाऊस आणि २०२४ मधील अपेक्षित तूट यांचा एकत्रित परिणाम दिसून येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Bengaluru water crisis)
कर्नाटक सरकारच्या म्हणण्यानुसार, बंगळूरमधील १४ हजार बोअरवेल्सपैकी जवळपास निम्मे बोअरवेल्स कोरडी पडली आहेत. बंगळूर शहराला कावेरी नदीतून सुमारे १,४७० एमएलडी पाणी मिळते. कावेरी प्रकल्पाचा टप्पा ५ जूनपर्यंत पूर्ण झाल्यास बंगळूरमधील पाणी समस्येची तीव्रता कमी होईल, अशा आशा कर्नाटक सरकारला आहे.
हेही वाचा :