मुंबई; पुढारी ऑनलाईन : चोरट्यांनी सोने लंपास केल्याच्या घटना रोज घडत आहेत. पण आता चक्क उंदरांनी सोने पळविल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील गोकुळधाम कॉलनीजवळील गटारातून उंदरांनी पळवलेले ५ लाख रुपये किमतीचे १० तोळे सोने पोलिसांनी परत मिळवले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे सोने सापडले असल्याची माहिती दिंडोशी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जी घार्गे यांनी दिली आहे.
एक महिला सोने बॅँकेत गहाण ठेवण्यासाठी चालली होती. या दरम्यान तिने वडा पाव म्हणून चुकून सोन्याची पिशवी रस्त्यावरील एका मुलाला दिली. मुलाने ती पिशवी कचऱ्यात फेकून दिली. त्यानंतर ही पिशवी उंदरांनी ओढून गटारमध्ये नेली. त्या पिशवीत चक्क १० तोळे सोने होते.
आपली पिशवी हरवल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेने ज्या मुलाला वडापावची पिशवी दिली होती त्याला शोधून काढले. पिशवीतील वडापाव सुखल्याने तो कचऱ्यात फेकून दिल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले.
काही उंदीर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एक पिशवी ओढून नेताना दिसले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता सोने असलेली पिशवी गटारात सापडली. पोलिसांनी गटारात शिरून उंदरांच्या तावडीतून सोन्याची पिशवी परत मिळवली असल्याचे घार्गे यांनी सांगितले. या घटनेची सगळीकडे मोठी चर्चा सुरु आहे.