

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईशान किशन श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार नसल्याचे समोर आले आहे. खुद्द संघाचा कर्णधार रोहित शर्मानेच (rohit sharma) याबाबत धक्कादायक विधान केले आहे. शुभमन गिलला पूर्ण संधी द्यावी लागेल आणि या कारणामुळे इशान प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असेल, असे भारतीय कर्णधाराने म्हटले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहितने आपले म्हणणे मांडले.
भारत-श्रीलंका यांच्यातील वन डे मालिका (IND vs SL) मंगळवारपासून (दि. 10) सुरू होत आहे. पहिला सामना बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. बांगलादेश दौऱ्यानंतर भारताचा हा पहिलाच सामना आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील सामन्यात इशान किशनने द्विशतक झळकावले. दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या (rohit sharma) जागी खेळताना या यष्टिरक्षक फलंदाजाने 131 चेंडूत 210 धावा फटकावल्या होत्या.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचा भाग नव्हता. इशानने शिखर धवनसोबत डावाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर फॉर्मशी झगडणाऱ्या धवनला संघातून वगळण्यात आले आहे. आता इशानला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने 15 डावात 57 च्या सरासरीने आणि 99 च्या स्ट्राइक रेटने 687 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. दुसरीकडे, इशान 2021 मध्ये भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्याने 9 डावात 53 च्या सरासरीने आणि 112 च्या स्ट्राईक रेटने 477 धावा केल्या आहेत. त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.
दरम्यान, रोहितने (rohit sharma) पत्रकार परिषदेत बुमराहबाबत एक वक्तव्य केले. तो म्हणाला की, बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये कठोर परिश्रम घेत होता, परंतु हे खूप दुर्दैवी आहे की तो वन डे मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे.
बुमराहच्या अचानक बाहेर पडण्यामागचे कारणही कर्णधाराने स्पष्ट केले. रोहित म्हणाला, बुमराह जेव्हा एनसीएमध्ये गोलंदाजी करत होता तेव्हा त्याला आपण अजून फिट नसल्याची जाणिव झाली होती. रोहितच्या पत्रकार परिषदेच्या काही वेळापूर्वी बीसीसीआयने बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून वगळण्याची पुष्टी केली होती. भारतीय गोलंदाजाला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही काळ हवा असल्याचे बोर्डाने म्हटले होते.
भारतीय संघासाठी करुण नायरने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले होते. कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज होता. यानंतरही पुढच्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याला काही संधी मिळाल्या. अखेर तो कायमचा संघाबाहेर गेला.