US Iran Conflict: 3 दिवसांत 3 जहाजे बुडवली; इराणसोबतच्या युद्धात अमेरिका भारतीय टँकरवर हल्ला का करत आहे? तेल पुरवठा संकटात

US Iran Conflict: अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांत भारतीय नाविक असलेल्या तीन जहाजांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
US Iran Conflict
US Iran ConflictPudhari
Published on
Updated on

US Iran Conflict: ओमानच्या किनाऱ्यापासून ते होर्मुझ सामुद्रधुनीपर्यंतचा समुद्री पट्टा सध्या पेटला आहे. गेल्या तीन दिवसांत भारतीय नाविक असलेल्या तीन वेगवेगळ्या जहाजांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याचा दावा केला जात आहे. या घटनांमुळे केवळ भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला नाही, तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेसमोर आणि परराष्ट्र धोरणासमोरही गंभीर आव्हान उभं राहिलं आहे.

सर्वात अगोदर ८ जून रोजी MT Marivex या टँकरवर कारवाई करण्यात आली. या जहाजावर २४ भारतीय नाविक होते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे जहाज इराणकडे जात असल्याने त्याला लक्ष्य करण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व भारतीय नाविकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

यानंतर ९ आणि १० जूनच्या मध्यरात्री MT Setebello या दुसऱ्या टँकरवर हल्ला झाला. ही घटना अधिक गंभीर होती. जहाजाच्या इंजिनला मोठं नुकसान झालं आणि जहाजात आग लागली. या दुर्घटनेत २४ पैकी २१ भारतीय नाविकांची सुटका झाली; मात्र तीन नाविकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारतात संतापाची लाट उसळली.

तिसरी घटना ११ जून रोजी घडली. MT Jalveer या जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागल्याची माहिती समोर आली. या जहाजावरही भारतीय नाविक होते. हा नेमका हल्ला होता की अपघात, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी भारतीय अधिकाऱ्यांचे परिस्थितीवर लक्ष आहे.

या घटनांमागे अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष असल्याचे मानले जात आहे. फेब्रुवारी २०२६ पासून दोन्ही देशांमधील तणाव अधिक तीव्र झाला. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील हालचालींवर निर्बंध आणले, तर अमेरिकेने इराणी बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांवर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली. परिणामी, या भागातून जाणारी व्यापारी जहाजे धोक्याच्या छायेत आली आहेत.

भारतासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे भारतीय नाविकांची सुरक्षा. जगभरातील व्यापारी जहाजांवर मोठ्या प्रमाणात भारतीय नाविक कार्यरत आहेत. खाडी देश, अरबी समुद्र आणि होर्मुझ परिसरात हजारो भारतीय दररोज काम करत असतात. त्यामुळे या भागातील संघर्षाचा थेट परिणाम भारतावर होतो.

US Iran Conflict
Pan Masala Ad: 5 रुपयाच्या गुटख्यात 5 लाखाचे केशर; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड स्टार्सना कोर्टाची नोटीस

दुसरी मोठी चिंता म्हणजे ऊर्जा सुरक्षा. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजांचा मोठा भाग आयात करतो. त्यातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि वायू होर्मुझ सामुद्रधुनीतून येतो. हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिला किंवा असुरक्षित राहिला, तर भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम महागाईवर आणि सर्वसामान्यांच्या खर्चावर होण्याची शक्यता आहे.

तिसरं आव्हान म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंध. अमेरिका हा भारताचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. मात्र भारतीय नागरिकांना धोका निर्माण झाल्यानंतर भारताने अमेरिकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन अधिकाऱ्यांना बोलावून निषेध नोंदवला असून व्यापारी जहाजांवरील कारवाया थांबवण्याची मागणी केली आहे.

US Iran Conflict
Sejal Pawar Apology: प्रणीत मोरेच्या शोमधील 'त्या' व्हायरल क्लिपनंतर डॉक्टर सेजल पवारचा माफीनामा; सोशल मीडियावर संताप

संयुक्त राष्ट्रांमध्येही भारताने हा मुद्दा उपस्थित केला आहे. व्यापारी जहाजांवरील हल्ले तात्काळ थांबवावेत, आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग सुरक्षित करावेत आणि संघर्षाचा राजनैतिक मार्गाने तोडगा काढावा, अशी भूमिका भारताने घेतली आहे.

सध्या परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक वाढल्यास त्याचा परिणाम केवळ पश्चिम आशियापुरता मर्यादित राहणार नाही. भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांनाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे भारत सरकार एकीकडे आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे ऊर्जा पुरवठा आणि राजनैतिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान पेलत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news