

Middle East Flight Disruption
दुबई/नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इरान यांच्यातील युद्धामुळे पश्चिम आशियातील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका हल्ल्यानंतर 'एमिरेट्स' कंपनीने दुबईला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. "कृपया विमानतळावर जाऊ नका. एमिरेट्स उपलब्ध झाल्यावर पुढील माहिती शेअर केली जाईल, असे कंपनीने आज (दि. ७) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. " दरम्यान, इ दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई येथून अबु धाबी, दुबई, फुजैराह, आरएएफ अक्रोतिरी आणि शारजाह या पाच ठिकाणांसाठी इंडिगो आपली विमाने पाठवणार आहे.
'दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट'वरील विमान सेवा आज दुपारी पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, दुबई विमानतळ प्रशासनाने 'X' पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आज (७ मार्च) आम्ही अंशतः विमान वाहतूक सुरू केली असून, दुबई इंटरनॅशनल आणि अल मकतूम विमानतळांवरून काही उड्डाणे सुरू झाली आहेत. मात्र, जोपर्यंत तुमची एअरलाईन तुमच्याशी संपर्क साधून फ्लाइटची खात्री देत नाही, तोपर्यंत कृपया विमानतळाकडे येऊ नका. उड्डाणांचे वेळापत्रक सतत बदलत असल्याने गोंधळ टाळण्यासाठी हे आवाहन करण्यात येत असल्याचेही विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
'एमिरेट्स' कंपनीने म्हटलं आहे की, "आम्ही आमच्या ग्राहकांच्या सामंजस्याबद्दल आणि संयमाबद्दल त्यांचे आभार मानतो. आमचे प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. २८ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान प्रवासासाठी बुकिंग केलेल्या ग्राहकांना पर्यायी विमानाचे बुकिंग करता येईल. तुम्ही ३० एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी तुमच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसऱ्या विमानाचे बुकिंग करू शकता."
दुबईमधील सर्व 'सिटी चेक-इन' पॉइंट्स पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.प्रवाशांनी ट्रॅव्हल एजंटमार्फत बुकिंग केले असेल, तर त्यांच्याशी संपर्क साधा. जर एमिरेट्सकडून थेट बुकिंग केले असेल, तर http://emirat.es/support वर संपर्क साधावा. तुम्ही तिकिटाच्या पैशांचा परतावा मिळवण्यासाठी http://emirat.es/refund वर फॉर्म भरून विनंती करू शकता, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
२८ फेब्रुवारीपासून बहरीन, दुबई, कुवेत आणि कतार यांसारख्या प्रमुख केंद्रांवरून मोठ्या प्रमाणावर विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील हवाई हद्द बंद असल्याने कतार एअरवेज आणि एतिहाद यांसारख्या बड्या कंपन्यांनी आपली नियमित सेवा स्थगित केली असून, सध्या केवळ विशेष बचाव मोहिमेसाठी विमानसेवा सुरु आहे.
आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एअर इंडिया, आकासा एअर, इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांनी दुबई, जेद्दाह आणि फुजैराह यांसारख्या मोठ्या विमानतळांवरून मर्यादित सेवा पुन्हा सुरू केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी भारतीय कंपन्यांनी ५१ विशेष विमानांचे नियोजन केले होते. ५ मार्चपर्यंत एकूण ४० विमानांमधून ७,२०५ प्रवाशांना भारतात सुखरूप परत आणण्यात आले आहे. आखाती देशांतून आतापर्यंत १४,९९२ प्रवासी भारतात परतले आहेत. शुक्रवार ६ मार्च रोजी भारतीय कंपन्यांची २७८ नियोजित उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
इंडिगो कंपनी आज (दि. ७) दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई येथून अबु धाबी, दुबई, फुजैराह, आरएएफ अक्रोतिरी आणि शारजाह या पाच ठिकाणांसाठी इंडिगो आपली विमाने पाठवणार आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची जेद्दाह आणि मस्कतसाठीची सेवा सुरू आहे, कारण हे मार्ग सुरक्षित असल्याचे मानला जातो.