पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा देशातील लष्करावर हल्लाबोल केला आहे. पाकिस्तान लष्कराला राजकारण करायचे असेल तर त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करावा, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहेत. तसेच पाकिस्तान लष्कराच्या माध्यम विभागाचे प्रमुख डीजी मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांचे नाव घेवून त्यांनी बोचरी टीकाही केली आहे. ( Imran khan and Pakistan army )
मागील आठवड्यातच भ्रष्टाचार प्रकरणी इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. यानंतर देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदा ठरवली. त्यांना जामीन मंजूर केला. शनिवारी ( दि.१३ ) लाहोर येथे आपल्या निवासस्थानी समर्थकांना संबोधित करताना इम्रान खान यांनी पुन्हा एकदा देशातील लष्करावर हल्लाबोल केला. इम्रान खान हे भोंदू राजकारणी आहेत, अशी टीका मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना इम्रान खान म्हणाले की, "जेव्हा तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हा मी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व करत होतो. मी माझ्या कामगिरीने देशाचे नाव उज्ज्वल करत होतो. मला भोंदू राजकारणी म्हणायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे."
यावेळी इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान लष्कराची राजकारण करण्याची इच्छ असेल तर त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करावा. माझ्यावर निराधार आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल करत मी जेव्हा पंतप्रधान होतो तेव्हा देशातील लष्कराची प्रतिमा चांगली होती. मात्र तत्कालीन लष्कर प्रमुखांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसत मला पदावरुन पायउतार केले. पाकिस्तानची सत्ता भ्रष्ट लोकांच्या हातात दिली. आता देशातील जनता लष्करावर टीका करत आहे. लष्करावर टीका माझ्यामुळे नव्हे तर देशातील माजी लष्कर प्रमुखांमुळे होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा :