Pakistan: पाकिस्तानात संसर्गजन्य रोगांचे थैमान; ४ हजारांहून अधिक रूग्णांची नोंद
पुढारी ऑनलाईन : महापुरानंतर अआता पाकिस्तानमध्ये संसर्गजन्य आजारांनी थैमान घातले आहे. आत्तापर्यंत अशा संसर्गाने ग्रस्त ४ हजारहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात सर्वाधिक म्हणजे ३९६३ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये रूग्णांना अतिसार, मलेरिया आणि त्वचारोगाचा संसर्ग आढळून आला आहे. बलुचिस्तानात डायरिया ९४७, कॉलरा ७७, श्वसनसंसर्ग १०५५, डोळ्यांचा संसर्ग झालेले १६५, मलेरिया ६७५, त्वचासंसर्ग १०४३ अशी प्रकरणे नोंद करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानातील ARY न्यूज चॅनलने दिली आहे.
बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात पुरामुळे झालेल्या विध्वंसानंतर विषाणूजन्य आजारांनी थैमान घातला आहे. ARY न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या भागात पूराच्या पाण्यामुळे हा संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये त्वचा आणि डोळ्यांचे संक्रमण, अतिसार, मलेरिया, टायफॉइड आणि डेंग्यू तापाची प्रकरणे आढळली आहेत. हा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने, पाकिस्तानमधील या भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तीन पूरग्रस्त प्रांतात महापुराने हजाराे नागरिकांचा बळी घेतला आहे. या आपत्तीत सरकारकडून सहकार्य आणि मदत मिळत नसल्याने येथील पाकिस्तानी नागरिक सरकारवर नाराज आहेत. एका सर्वेक्षणातून येथील नागरिकांचा संताप दिसून आला आहे. पाकिस्तानातील या तीन पूरग्रस्त प्रांतातील ९२ टक्के नागरिकांना त्यांची गावे आणि परिसर सोडून जावे लागले आहे.
एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या मते, पाकिस्तानातील पूरग्रस्त भागातील अनेक लोकांना अन्न आणि औषधांची तातडीने गरज आहे. अशा परिस्थितीत सरकारसह, स्थानिक आणि परदेशी मदत संस्था आणि मानवतावादी संस्थांनी मदत करण्याची गरज आहे.