![सावधान..! विनापरवाना वाहन चालविल्यास 10 हजार दंड](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2F1-30-50.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्य सरकारला नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी आठवली आहे. वाहतूक नियमभंग करणार्यांसाठी जबर दंडाची तरतूद असलेली ही कायदा दुरुस्ती 1 एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. तशी जाहीर सूचना वाहतूक खात्याने प्रसिद्ध केली आहे. सर्वसाधारण गुन्ह्यासाठी पाचशे रुपये, परवान्याविना वाहन चालवल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
वेग मर्यादा ओलांडल्यास हलक्या वाहन चालकांसाठी 1 हजार रुपये, तर इतर वाहनांसाठी 2 हजार रुपये दंड असेल. वाहन नोंदणीशिवाय ते चालवल्यास 2 हजार रुपये, परवान्याविना वाहन रस्त्यावर आणल्यास 10 हजार रुपये, सीट बेल्ट न लावता वाहन चालवल्यास 1 हजार रुपये, दुचाकीवर तीन जणांनी प्रवास केल्यास 1 हजार रुपये, हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास 1 हजार आणि वाहन विम्याविना वाहन चालवल्यास 2 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.
दंडाच्या रकमेत वाढ केल्यास निवडणुकीच्या तोंडावर लोकांची नाराजी महागात पडू शकते असे वाटल्याने 27 जुलै 2021 रोजी हे नवे नियम अधिसूचित करूनही त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली होती.
हेही वाचलंत का?