

hindu kush himalaya glaciers melting: हिंदूकुश हिमालय (HKH) क्षेत्रातील हिमनद्या (Glaciers) २००० सालापासून दुप्पट वेगाने वितळत असल्याचे एका धक्कादायक अहवालातून समोर आले आहे. 'इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट' (ICIMOD) ने जागतिक हिमनदी दिनानिमित्त (२१ मार्च) प्रसिद्ध केलेल्या दोन महत्त्वाच्या अहवालांतून ही माहिती दिली आहे. या अहवालानुसार, १९७५ पासून आतापर्यंत बर्फाच्या थराची जाडी २७ मीटरने कमी झाली आहे.
हिमनद्या वितळण्यामागे जागतिक तापमान वाढ हे मुख्य कारण असले तरी, हिंदूकुश हिमालयात खालील विशिष्ट घटक कारणीभूत ठरत आहेत
एलिव्हेशन-डिपेंडंट वॉर्मिंग (Elevation-Dependent Warming): हिमालयातील ७८% हिमनद्या ४,५०० ते ६,००० मीटर उंचीवर आहेत. या उंचीवर तापमानातील वाढ इतर भागांपेक्षा अधिक वेगाने होत आहे, ज्यामुळे बर्फ वेगाने वितळत आहे.
लहान हिमनद्यांचे अस्तित्व: या क्षेत्रातील ७५% हिमनद्या आकाराने लहान (०.५ चौ.किमी पेक्षा कमी) आहेत. या लहान हिमनद्या हवामान बदलाला अधिक संवेदनशील असून त्या मोठ्या हिमनद्यांच्या तुलनेत वेगाने आकुंचन पावत आहेत.
मागील ३० वर्षांतील बदल: १९९० ते २०२० या काळात हिमनद्यांच्या एकूण क्षेत्रफळात १२% आणि बर्फाच्या साठ्यात ९% घट झाली आहे.
हिमनद्या वितळण्याचे परिणाम केवळ डोंगराळ भागापुरते मर्यादित नसून, संपूर्ण आशिया खंडासाठी ते गंभीर आहेत
जलसंकट: सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांसारख्या आशियातील १० प्रमुख नद्यांचे उगमस्थान या हिमनद्या आहेत. 'आशियाचे वॉटर टॉवर्स' मानल्या जाणाऱ्या या नद्यांवर सुमारे २ अब्ज लोकांचे अन्न, पाणी आणि ऊर्जा सुरक्षा अवलंबून आहे.
नैसर्गिक आपत्तींचा धोका: बर्फ वेगाने वितळल्यामुळे 'ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड' (GLOF) सारख्या अचानक येणाऱ्या महापुरांचा आणि ढगफुटीसारख्या घटनांचा धोका वाढला आहे.
स्थानिक समुदायांचे विस्थापन: डोंगराळ भागातील लहान हिमनद्या कोरड्या पडल्यामुळे स्थानिक समुदायांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे.
अन्न आणि ऊर्जा असुरक्षितता: नद्यांच्या प्रवाहात होणाऱ्या बदलांमुळे शेतीवर परिणाम होऊन अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते, तसेच जलविद्युत प्रकल्पांनाही धोका पोहोचू शकतो.
ICIMOD चे महासंचालक पेमा ग्यामत्सो यांनी याला 'रिअल-टाइम संकट' म्हटले आहे. २० २५-२०३४ हे दशक 'क्रायोस्फेरिक सायन्स' (बर्फ विज्ञानाचे दशक) म्हणून पाळले जात असून, या काळात हिमनद्यांचे निरीक्षण वाढवणे आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या उपाययोजनांवर गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे.