

Sanjeev Kapoor on Kolhapur food: भारतातील खाद्यसंस्कृतीबद्दल बोलताना नेहमीच दिल्ली, मुंबई किंवा लखनौचा उल्लेख केला जातो. मात्र, प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये कोल्हापूर शहराचा उल्लेख 'मोस्ट अंडररेटेड फूड सिटी' असा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोल्हापूरच्या अस्सल तांबडा-पांढरा रस्सा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी एएनआय (ANI) च्या पॉडकास्टमध्ये स्मिता पारेख यांना दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. जेव्हा स्मिता पारेख यांनी त्यांना भारतातील सर्वात अंडररेटेड खाद्य शहर कोणते, असा प्रश्न विचारला, तेव्हा कपूर यांनी विचारपूर्वक कोल्हापूर हे नाव घेतले.
मुलाखतीदरम्यान जेव्हा सुरत शहराचा संदर्भ आला, तेव्हा संजीव कपूर यांनी स्पष्टपणे सांगितले की, सुरतचे जेवण कोणत्याही प्रकारे 'अंडररेटेड' नाही. उलट अनेक लोक तिथे जेवणासाठी जातात, त्यामुळे त्याला 'ओव्हररेटेड' म्हणता येईल. परंतु कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला जी प्रसिद्धी मिळायला हवी होती, ती अजूनही मिळालेली नाही, असे त्यांना वाटते.
संजीव कपूर यांनी कोल्हापुरी मांसाहारी पदार्थांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "कोल्हापुरी मटन आणि तिथे मिळणारा तांबडा-पांढरा रस्सा हे पदार्थ खरोखरच 'आऊटस्टँडिंग' आहेत. दुर्दैवाने या पदार्थांबद्दल महाराष्ट्राबाहेर फार कमी लोकांना माहिती आहे."
संजीव कपूर यांच्यासारख्या जागतिक ख्यातीच्या शेफने कोल्हापूरच्या जेवणाची दखल घेतल्याने, आता कोल्हापूरची ही चव केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील खवय्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. अस्सल कोल्हापुरी बेत आणि तिथली आदरातिथ्य करण्याची पद्धत ही खरोखरच वेगळी असल्याचे त्यांनी या मुलाखतीतून अधोरेखित केले.