कृषी क्षेत्रात स्वच्छ ऊर्जा | पुढारी

कृषी क्षेत्रात स्वच्छ ऊर्जा

देशातील वाढते प्रदूषण आणि ऊर्जेची गरज यात ताळमेळ बसवताना क्लीन एनर्जी ही मोलाची भूमिका बजावू शकते. विशेषत: कृषी क्षेत्रातील डिझेलचा वापर शून्यावर आणण्याबरोबरच इंधन आयातीवरचा खर्च कमी करण्यासाठी सौर, पवन ऊर्जा तसेच सीएनजी, इलेक्ट्रिक या पर्यायी स्रोतांकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कृषी क्षेत्रात स्वच्छ ऊर्जा वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून हवामान बदलाचे चटके सर्वांनाच बसत आहेत. त्यामुळे देशात पर्यावरणपूरक स्वच्छ ऊर्जा (क्लीन एनर्जी) ची निर्मिती आणि वापर यास प्रोत्साहन देण्यास केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यानुसार तीन वर्षांत म्हणजेच 2024 पर्यंत डिझेलवरचे कृषी क्षेत्राचे अवलंबित्व संपवण्याचे ध्येय निश्‍चित करण्यात आले आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंह यांनी यासंदर्भात अधिकार्‍यांसमवेत नुकतीच महत्त्वाची बैठक घेतली. विशेष म्हणजे भारतात एकूण पेट्रोलियम विक्रीत डिझेलचा वाटा हा सुमारे 40 टक्के आहे. डिझेलचा वापर कृषी क्षेत्रात सर्वाधिक असून हे क्षेत्र दुसरे मोठे ग्राहक म्हणून ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेे होते की, पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या वापराला प्रोत्साहन देऊन डिझेलचा वापर कमी करू शकतो. अन्य प्रकारच्या इंधनाबरोबरच डिझेलपासून सर्वाधिक ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन होते. हे उत्सर्जन पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला आणि हवामान बदलाला कारणीभूत आहे. हे उत्सर्जन प्रदूषणाला पोषक आहे. सरकारने या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अनेक उपाय आखले आहेत. या उपायांत बिगर जीवाश्म इंधन क्षमतेला वाढवून ती 500 गिगावॅट करणे याच समावेश करावा लागेल.

भारताने 50 टक्के ऊर्जेची गरज क्लीन एनर्जीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा संकल्प देखील सरकारने केला आहे. पेट्रोलियम पदार्थावर आपली अवलंबिता ही आर्थिक आघाडीवर देखील चिंताजनक आहे. आपण सध्या 85 टक्के कच्चे तेल आयात करते आणि त्यावर वार्षिक आठ लाख कोटी रुपये खर्च होतात. व्यापार तोट्यात जाण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर आंंतरराष्ट्रीय बाजारात उलथापालथ होत असल्याने आयात खर्चाबरोबर ठोक किमतीदेखील वाढत आहेत. त्यामुळे चलनवाढीला चालना मिळते. डिझेलला पर्याय म्हणून बायो डिझेल, सीएनजी आणि बायो इथेनॉलचा वापर वाढवू शकतो. सौर आणि पवन ऊर्जेचा देखील विस्तार होत आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना देखील प्रोत्साहन दिले आहे. या सर्व आघाड्यांवर तंत्रज्ञानाची क्षमता वाढवण्याबरोबरच संशोधन प्रक्रियेत देखील गती येत आहे. अशा कृतींतून पर्यायी इंधनाची पुरेशी क्षमता प्राप्त करणे शक्य होऊ शकते. कृषी क्षेत्रात असे असंंख्य उपकरणे असून त्याचा वापर अन्य क्षेत्रातही केला जातो. जसे की ट्रॅक्टर, मोटारपंंप आदी. डिझेल आणि पेट्रोलशिवाय गॅस आणि कोळशावरही आपण अवलंंबून आहोत.

देशात विपूल साठा असूनही कोळशाची आयात करावी लागत आहे. कृषी क्षेत्रात क्लीन एनर्जीवर भर दिल्याने वाहतूक आणि निर्मिती क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. ऊर्जेच्या बाबतीत भारत जगातील तिसरा मोठा ग्राहक आहे. दुसरीकडे वाढत्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी ऊर्जेला मागणी वाढत चालली आहे. आपली निर्यात देखील वाढत चालली आहे आणि यात कृषी उत्पादनाचा मोठे योगदान आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्‍न वाढण्याबरोबरच घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजाराची मागणी पूर्ण करणसाठी उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. ‘क्लीन एनर्जी’मुळे या प्रयत्नांना बळ मिळू शकते. याशिवाय तंत्रज्ञान आणि अन्य स्रोतांच्या विस्तारातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आपल्याकडे वेळ फार नाही. त्यामुळे सरकार, कृषी उद्योग तसेच शेतकर्‍यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.
– विलास कदम

Back to top button