

Nayara Refinery Shutdown: मिडल ईस्टमधील तणावामुळे आधीच कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असताना आता भारतातील इंधन साठ्याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी रिफायनरी असलेल्या नायरा एनर्जीने गुजरातमधील वाडिनार येथील आपला प्लांट तब्बल 35 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा प्लॅन आहे.
ही रिफायनरी बंद करण्यामागचं कारण म्हणजे देखभाल (Maintenance). अशा प्रकारचे शटडाउन ठराविक कालावधीनंतर आवश्यक असतात. मात्र, यावेळी जागतिक स्तरावर तणाव आहे, तेलाच्या किंमती $100 प्रति बॅरलच्या वर आहेत आणि पुरवठ्यावर आधीच दबाव आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरतोय.
नायरा एनर्जीची ही रिफायनरी दरवर्षी सुमारे 2 कोटी टन कच्चं तेल प्रक्रिया करते, जे भारताच्या एकूण रिफायनिंग क्षमतेच्या सुमारे 8% आहे. म्हणजे 35 दिवस उत्पादन बंद झालं तर बाजारात इंधनाची आवक कमी होईल. पुरवठ्यावर याचा थेट परिणाम होईल.
नायरा एनर्जी देशातील 6,300 पेक्षा जास्त पेट्रोल पंपांना इंधन पुरवते. जर उत्पादन बंद राहिलं, तर काही भागात पुरवठा कमी होऊ शकतो. पेट्रोल पंपांवर तात्पुरता ताण निर्माण होऊ शकतो. पण कंपनीचा दावा आहे की त्यांच्याकडे पुरेसा स्टॉक आहे आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
सध्या इराण-इस्रायल तणाव, रशिया-युक्रेन युद्ध आणि Hormuz Strait परिसरातील धोका... यामुळे जागतिक पुरवठा साखळी आधीच तणावाखाली आहे. अशा परिस्थितीत बाहेरून तेल खरेदी करणे महाग होऊ शकते.
रिफायनरी बंद असल्यामुळे लोकांमध्ये पॅनिक बायिंग (घाबरून खरेदी) होण्याची शक्यता वाढते. जर असं झालं तर पेट्रोल पंपांवर गर्दी वाढू शकते आणि स्थानिक पातळीवर तात्पुरती कमतरता जाणवू शकते.
नायरा एनर्जीचा पुरवठा कमी झाल्यास ग्राहकांचा ओघ सरकारी कंपन्यांकडे वळू शकतो:
Indian Oil Corporation
Bharat Petroleum Corporation Limited
Hindustan Petroleum Corporation Limited
यामुळे सरकारी पंपांवर ताण वाढण्याची शक्यता आणि लॉजिस्टिक्सची आव्हानं निर्माण होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते: ग्रामीण आणि निम-शहरी भागात परिणाम अधिक जाणवू शकतो कारण तिथे नायरा एनर्जीचं जाळ चांगलं आहे. नायरा एनर्जीच्या 35 दिवसांच्या शटडाउनमुळे देशभरात मोठं संकट निर्माण होईल असं नाही, पण काही भागात तात्पुरता ताण निर्माण होऊ शकतो.
सध्या तरी पुरेसा स्टॉक उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. सरकार आणि कंपन्यांकडून लक्ष ठेवले जात आहे. म्हणून नागरिकांनी घाबरून इंधन साठा करु नये.